शिवसेनेच्या 'वेट ऍन्ड वॉच'मुळे हेमंत गोडसेंना केंद्रात मंत्रीपद मागणारे उद्योजक शांत 

शिवसेनेच्या 'वेट ऍन्ड वॉच'मुळे हेमंत गोडसेंना केंद्रात मंत्रीपद मागणारे उद्योजक शांत 

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर नाशिकला केंद्रात मंत्रिपद मिळाले नाही. ही उपेक्षा शिवसेनेचे हेमंत गोडसे यांच्या रूपाने भरून निघावी, असा आग्रह धरण्यासाठी विविध व्यावसायिकांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मोट बांधण्यात आली. पण प्रत्यक्षात शिवसेनेकडून 'वेट ऍन्ड वॉच'रूपी प्रतिसाद मिळाल्याने व्यावसायिकांच्या संघटना थबकल्या आहेत. अन्य नेत्यांच्या रोषामुळे ही मागणी करणारे उद्योजक, व्यावसायिक आता शांत झाले आहेत.

नाशिक : स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर नाशिकला केंद्रात मंत्रिपद मिळाले नाही. ही उपेक्षा शिवसेनेचे हेमंत गोडसे यांच्या रूपाने भरून निघावी, असा आग्रह धरण्यासाठी विविध व्यावसायिकांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मोट बांधण्यात आली. पण प्रत्यक्षात शिवसेनेकडून 'वेट ऍन्ड वॉच'रूपी प्रतिसाद मिळाल्याने व्यावसायिकांच्या संघटना थबकल्या आहेत. अन्य नेत्यांच्या रोषामुळे ही मागणी करणारे उद्योजक, व्यावसायिक आता शांत झाले आहेत. 

लोकसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्‍याने विजयी झालेले शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना मंत्रिपद मिळावे म्हणून नेतृत्वाला भेटणार असल्याची माहिती देण्यासाठी रविवारी 'निमा' सभागृहात पत्रकारांशी विविध व्यावसायिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा वार्तालाप होणार होता. त्यात क्रेडाई, निमा, आयमा, नाईस, निवेक, नाशिक सिटिझन फोरम, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ऍन्ड इंडस्ट्री-ऍग्रिकल्चर, नरडेका, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्‍ट आणि इंटेरिअर डिझायनर्स, नाशिक बार असोसिएशन, सी. ए. असोसिएशन, आय.एम.ए. या संघटनांचा समावेश होता. मात्र त्याच्या पूर्वसंध्येला पुन्हा हा संवाद पुढे ढकलण्यात येत असल्याचा निरोप माध्यमांच्या कार्यालयात धडकला. 

संवाद का पुढे ढकलण्यात आला, त्यासंबंधीची माहिती घेतल्यावर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची वेळ जुळत नसल्याचे कारण सांगण्यात आले. त्याच वेळी काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या वेळेचे कारण पुढे केले. त्यामुळे  गोडसे यांच्या मंत्रिपदाच्या आग्रहासाठी इतर नेत्यांच्या रोषाला सामोरे जायचे कशाला, असा काहीसा सावध पवित्रा घेत वेळेचे कारण पुढे गेले नसावे ना, अशा शंकेची पाल नाशिककरांमध्ये चुकचुकू लागली आहे. 

गोडसे यांची मंत्रिपदासाठीच्या दावेदारीचा खुंटा बळकट करण्यासाठी सरकारच्या चांगुलपणाचे गुणगान करण्याचा फंडा राबविण्यात येणार असल्याचे व्यावसायिक संघटनांच्या झालेल्या बैठकीतील सुरातून पुढे आले आहे. मुळातच, राज्याच्या मंत्रिमंडळात नाशिकला स्थान मिळालेले नाही. त्यामुळे केंद्राच्या मंत्रिमंडळात नाशिकच्या स्थानाबद्दल कितपत विचार होईल, असा प्रश्‍नही यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. केंद्रात वाट्याला येणाऱ्या मंत्रिपदाचा विचार करता, अनंत गिते यांचा पराभव झाल्याने त्यांच्याऐवजी संधी देताना शिवसेना ज्येष्ठांचा विचार करणार नाही का, असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे. त्यामध्ये अनिल देसाई, संजय राऊत, अरविंद सावंत, गजानन कीर्तिकर, भावना गवळी, श्रीरंग बारणे या ज्येष्ठ खासदारांचा समावेश आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com