टेंभूच्या पाण्यासाठी प्रसंगी कालवा तोडू : जयकुमार गोरे

माण व खटाव तालुक्‍यातील सोळा गावांना टेंभू योजनेतून पाणी देण्याचा निर्णय एक महिन्याच्या आत झाला नाही, तर 32 गावांतील जनावरे जिल्हाधिकारी कार्यालयात सोडण्याचा निर्णय आज कुकुडवाडी (ता. माण) येथे झालेल्या पाणी परिषदेत सर्वानुमते घेण्यात आला.
टेंभूच्या पाण्यासाठी प्रसंगी कालवा तोडू : जयकुमार गोरे

म्हसवड (ता. माण, जि. सातारा) : माण व खटाव तालुक्‍यातील सोळा गावांना टेंभू योजनेतून पाणी देण्याचा निर्णय एक महिन्याच्या आत झाला नाही, तर 32 गावांतील जनावरे जिल्हाधिकारी कार्यालयात सोडण्याचा निर्णय आज कुकुडवाडी (ता. माण) येथे झालेल्या पाणी परिषदेत सर्वानुमते घेण्यात आला. आमच्या पाण्यावर कुणी हक्क सांगत असेल तर प्रसंगी कालवा तोडू असा इशारा आमदार जयकुमार गोरे यांनी यावेळी दिला.

कुकुडवाडी आज येथे या 32 गावातील ग्रामस्थांची टेंभू उपसा योजनेबाबत पाणी परिषद झाली यामध्ये सर्वानुमते हा ठराव करण्यात आला.  यावेळी माण, खटावचे आमदार जयकुमार गोरे, भाजपचे उपाध्यक्ष अनिल देसाई, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख उपस्थित होते. माण -खटाव मधील 32 गावांचा शासनाने सुरू केलेल्या कोणत्याही योजनेत समावेश झालेला नाही. त्यामुळे ही गावे दुष्काळाने पिचली असून दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढत आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने या 32 गावांत आज लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला आहे. या भागाला पाणी मिळाले नाही तर भविष्यात लोकांना स्थलांतर करण्याशिवाय पर्याय नाही, अशी भुमिका परिषदेचे संयोजक सदस्य विठ्ठल काटकर यांनी मांडली. 

यावर आमदार जयकुमार गोरे म्हणाले की, माझ्या मतदारसंघात जी गावे पाण्यापासून वंचित आहेत. त्या गावांसाठी टेंभूच्या पाणीवाटपाचे प्रसंगी फेर नियोजन करावे. लवाद, पाणी वाटप आम्हाला माहिती नाही. माझ्या मतदारसंघात पाणी आल्याशिवाय मी पाण्याचा एकही थेंब पुढे जाऊ देणार नाही. ही भूमिका मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितली आहे. जो काय निर्णय घ्यायचा तो घेतील, पण दुष्काळी भागाला पाण्यापासून वंचित ठेऊन कोणी पाणी पुढे नेणार असेल, आमच्या पाण्यावर कोणीही हक्क सांगत असेल, तर प्रसंगी कालवा तोडून कायदा हातात घेऊ, असा इशारा त्यांनी दिला. 

प्रभाकर देशमुख म्हणाले, या भागाला पाणी मिळण्यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. या 32 गावांना पाणी मिळण्यासाठी यापुढे जी आंदोलने होतील त्या त्या वेळी मी तुमच्या सोबत असेन. अनिल देसाई म्हणाले, या 32 गावांना पाणी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माण व खटाव तालुक्‍यातील या वंचित गावांना पाणी देण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे या भागाचा पाणी प्रश्न भाजपच्या माध्यमातून सोडविणार असल्याचे सांगताना त्यांनी सत्ता नसणाऱ्यांनी या कामाचे श्रेय घेऊ नये, असे नमूद केले. 

यावेळी दीपक खताळ, अतुल देशमुख, माणिक महाराज, सतीश काटकर, संजय साळुंखे, राजेंद्र लोखंडे, नवनाथ गोरड, भगवान जाधव डॉ.रवींद्र काटकर, विक्रम काटकर, आदींनी मनोगत व्यक्त केले. 32 गावातून हजारो नागरिकांनी व महिलांनी पाणी परिषदेसाठी प्रचंड उपस्थिती लावली होती.  टेंभूच्या पाण्याबाबत एक महिन्याच्या आत सकारात्मक निर्णय न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात 32 गावातील जनावरे सोडण्याचा आणि चितळी येथील जलसेतूमध्ये 32 गावांतील महिला व पुरुषांनी जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला. शासन व प्रशासन यांना एक महिन्याचा अल्टीमेटम देऊन या आंदोलनाच्या तारखा टेंभू पाणी योजना संघर्ष समिती निश्‍चित करेल, असे जाहिर करण्यात आले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com