छत्रपती संभाजीराजेंनी उद्धव ठाकरेंचे वेधले लक्ष तीन महत्वाच्या प्रश्‍नांकडे...

छत्रपती संभाजीराजेंनी उद्धव ठाकरेंचे वेधले लक्ष तीन महत्वाच्या प्रश्‍नांकडे...

मुंबई : खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन रायगड विकासाच्या कामात गैरव्यवहार होत असल्याची तक्रार केली तसेच सारथी संस्था आणि मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई याकडेही त्यांचे लक्ष वेधले. यासंदर्भात त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून या सगळ्या घटनेची आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या चर्चेची माहिती दिली आहे. 


आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, रायगड मधील भ्रष्टाचार, सारथी संस्थेची स्वायत्तता आणि सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाचा लढा याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आज सविस्तर चर्चा केली. रायगड किल्ला परिसरातील कामांमध्ये कसलाही भ्रष्टाचार चालू देणार नाही आणि कुणाचीही मुजोरी खपवून घेणार नाही ही भूमिका घेऊन मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी माझं पूर्ण म्हणणं ऐकून घेतलं. मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की राजे, रायगड चे काम हे आपल्याच नेतृत्वात झाले पाहिजे ही केवळ माझीच इच्छा नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांची मागणी आहे. तुम्ही मागील अनेक वर्षांपासून आपण गडकिल्ल्यांच्या संवर्धना साठी प्रयत्न करत आहात. तुमची महाराजांच्या किल्ल्यांबद्दल असलेली आत्मीयता आम्ही सर्व जण जाणतो. तुम्ही तिथे आहात म्हणून सर्व काही सुरळीत चालू आहे. तुम्हाला येणारी प्रत्येक अडचण सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. फक्त तुम्ही राजीनामा देऊ नका. यावेळी मी त्यांना आश्वासन दिलं की पूर्वीच्याच जोमाने किंवा त्यापेक्षा जास्त ताकदीने किल्लेसंवर्धन करत राहीन. 

ते पुढे म्हणतात " यावेळी मी सारथी संस्थेच्या स्वायत्तेसाठी आग्रही मागणी केली. मराठा समाजातील हजारो युवकांना या संस्थेचा थेट लाभ होत आहे. समाजातील येणाऱ्या अनेक पिढ्यांना घडवण्याचे कार्य या माध्यमातून होणार आहे. आणि त्या संस्थेच्या स्वायत्ततेवर कुणीतरी एक हेकेखोर अधिकारी घाला घालण्याचा प्रयत्न करतो हे ठीक नाही. याबाबत सर्व माहिती मी त्यांना दिली. परिहार साहेबांना कायम ठेवण्याचीही मागणी केली. त्यांनी याबाबतही सकारात्मकता दाखवत तात्काळ निर्णय करण्याचा शब्द दिला. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर लगेच याबाबत निर्णय करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे मराठा आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयात असलेल्या लढ्यात पूर्वीच्याच वकिलांना ठेवण्याची मागणी केली. मी स्वतः प्रत्येक तारखेला न्यायालयात हजर असतो. आणि आपली केस व्यवस्थित चालू होती त्यामुळे, वकील तेच ठेवावेत. यावर त्यांनी विश्वास दिला की कुठल्याही परिस्थितीत आरक्षणाच्या लढ्यात कमतरता ठेवली जाणार नाही. पूर्वीपेक्षाही जास्त ताकदीने आपण सर्वजण हा लढा लढू असेही त्यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com