मुख्यमंत्र्यांचा फोन न घेणारे तानाजी सावंत आढावा बैठकीलाही आले नाहीत...

मुख्यमंत्र्यांचा फोन न घेणारे तानाजी सावंत आढावा बैठकीलाही आले नाहीत...

औरंगाबाद : उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बंड पुकारत शिवसेनेचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार प्रा. तानाजी सांवत यांनी खळबळ उडवून दिली. अगदी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, मिलिंद नार्वेकर यांचे फोन देखील त्यांनी घेतले नव्हते. यावरून सावंत पक्ष नेतृत्वावर किती नाराज आहेत हे दिसून आले होते. विशेष म्हणजे उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आलेल्या मराठवाड्याच्या आढावा बैठकीला देखील ते आले नाहीत. शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मात्र बैठकीला हजेरी लावत जिल्ह्यातील प्रश्‍न मांडले. 

राज्यमंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे कमालीचे नाराज असलेले तानाजी सावंत यांनी नुकत्याच झालेल्या उस्मानाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मदत केली. पुतण्या धनंजय सांवत याला उपाध्यक्ष करत भविष्यात आपली वाटचाल कोणत्या दिशेने असेल याची झलक पक्षनेतृत्वाला दाखवली होती. त्यामुळे शिवसेनेच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या कुठल्याच कार्यक्रमाला न जाता बहिष्कार टाकण्याची भूमिकाच सावंत यांनी घेतल्याचे त्यांच्या कृतीतून स्पष्ट झाले आहे. 

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पहिल्यांदाच मराठवाड्यातील विकास प्रश्‍नांचा आढावा घेण्यासाठी महत्वाची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित केली होती. या बैठकीला मराठवाड्यातील बहुतांश आमदार, खासदार उपस्थित होते. उस्मानाबादहून ओमप्रकाश राजेनिंबाळकर देखील बैठकीला उपस्थित होते. पण युती सरकारच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री राहिलेले व उपनेते, आमदार तानाजी सावंत यांनी मात्र बैठकीला दांडी मारली. त्यांची अनुपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. 

ठाकरेंकडून त्यांची दखल नाही... 
मंत्रिपद न मिळाल्यामुळे "पुन्हा मातोश्रीची पायरी चढणार नाही' अशी टोकाची भूमिका घेत तानाजी सावंत मुंबईहून परतले होते. तेव्हापासून त्यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी कुठलाच संपर्क ठेवला नाही. अगदी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सावंत भाजप सोबत जाणार यांची खबर मातोश्रीवर गेल्यानंतर देखील त्यांच्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला. खुद्द उध्दव ठाकरे, मिलिंद नार्वेकर यांनी सावंत यांची समजूत काढण्यासाठी त्यांच्यांशी फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला. पण सावंत यांनी त्यांचे फोनच घेतले नाही अशी देखील माहिती आहे. सावंत यांच्या बंडखोरीनंतर आता त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांकडून होत आहे. या पार्श्‍वभूमीवर सावंत आढावा बैठकीला येणार का ? याची चर्चा होती. पण अपेक्षेप्रमाणे सावंत यांनी बैठकीला येणे टाळले. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांची दखल घेतली नसल्याचे समजते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com