""ज्ञानेश्‍वर, आत्महत्या करू नको असे मी त्याला सांगितले होते : तटकरे 

""ज्ञानेश्‍वर, आत्महत्या करू नको असे मी त्याला सांगितले होते : तटकरे 

सरकारनामा ब्युरो 

मुंबई : मंत्रालयात सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या करणारा शेतकरी ज्ञानेश्‍वर साळवे यांने मला फोन केला होता. 'मी मंत्रालयात जाऊन आत्महत्या करणार' असल्याचे तो सांगत होता. मी त्याला वय विचारले तो म्हणाला 22 वर्षे. मी त्याला म्हणालो, "" एवढ्या तरूणपणी तू का आत्महत्या करतोय. असे करू नको '' असे सांगत त्याला अशी कृती करण्यापासून मी रोखले अशी माहीती "राष्ट्रवादी' चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज दिली. 

साळवे हा उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे. त्याने काल (शुक्रवारी) मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो आपल्या मोबाईलवर बोलत होता. मात्र तो कोणाशी बोलतोय ही उत्सुकता लागली असतानाच तटकरे यांनी तो आपल्याशी मंत्रालयात जाण्यापूर्वी बोलला होता असे सांगितले. तटकरे यांनी अशी कृती करण्यापासून त्या तरूणाला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र साळवे याने मोबाईल बंद केला आणि थेट मंत्रालयाचा सहावा मजला गाठला. 

तटकरे म्हणाले, की उस्मानाबादेतील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, तो पक्षाचा क्रियाशील कार्यकर्ता नाही. दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद निवडणूकांच्यावेळी तो पक्षात आला. पण त्यांनंतर त्याचा पक्षाशी कोणताही संबंध आला नसल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. 

तटकरे यांनी सांगितले की काल दुपारी मला एक फोन आला. मी त्याला म्हटले ही की "तू का आत्महत्या करतोय? तेव्हा त्याने मला कृषीमंत्री भेटत नसल्याच सांगितले. त्यावेळी तुम्ही आम्हाला भेटा तुमची समस्या घेऊन आम्ही तुम्हाला कृषीमंत्र्यांकडे घेऊन जातो असे मी सांगितले. त्याला समजावले. पण त्याने फोन बंद केला. त्यानंतर जो काही प्रकार झाला तो सर्वांनी पाहिला. राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा कुठल्याही गोष्टीला समर्थन देत नाही असे सांगतानाच साळवेचा राष्ट्रवादी पक्षाशी कोणताही संबंध नाही असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. 

... तर ज्ञानेश्‍वरचा "राष्ट्रवादी'ला अभिमान : मलिक 
उस्मानाबादेतील ज्ञानेश्वर साळवे हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असला तरी त्याला मंत्रालयात पक्षाने अशी कृती करायला सांगितली नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर इतक्‍या तळमळीने तो आपला जीव धोक्‍यात घालून आंदोलन करत होता. त्यामुळे पक्षाला ज्ञानेश्वरचा अभिमान असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवक्ते नवाब मलिक आज केले. 

या शेतकरी तरुणाने शेतीसंदर्भात व्यथा मांडण्यासाठी कृषीमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु त्याला भेट मिळू शकली नसल्याने त्याने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर चढून आंदोलन केले होते, पण तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचे सांगत सत्ताधारी भाजपकडून "राष्ट्रवादी'वर आरोप करण्यात आले होते. त्या आरोपाला मलिक यांनी उत्तर दिले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आदेशावरुन कृती केलेली नाही. मात्र, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर इतक्‍या तळमळीने आंदोलन करत असेल तर पक्षाला त्याचा अभिमान असल्याचे मलिक म्हणाले. 

साळवे यांनी मंत्रालयात केलेल्या कृतीनंतर भाजपकडून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे बोट दाखवण्यात आले. हा स्टंट राष्ट्रवादीनेच करण्यास भाग पाडले, तो राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्याला आंदोलन करायला सांगितले असा आरोप करण्यात आला होता.त्या आरोपाची दखल घेत मलिक यांनी सरकारवर टीका करत आपल्याला त्या आंदोलनकर्त्याचा अभिमान असल्याचे सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com