भारतीय राजकारणाचा अभ्यास करताना "मोदीपर्व' महत्वाचा संदर्भ ग्रंथ ठरेल : सुधींद्र कुलकर्णी

""पुस्तकाचे शीर्षक "मोदीपर्व' असे असले तरी ते मोदी यांचा कार्यकाल अशा अर्थानं ठेवलं गेलं आहे. कारण या पुस्तकात कुठल्याही व्यक्तिस्तोमापेक्षा मोदी यांनी घेतलेल्या निर्णय, धोरणांवर सर्व बाजूंनी सखोल विश्‍लेषण मांडलं गेलं आहे.''
भारतीय राजकारणाचा अभ्यास करताना "मोदीपर्व' महत्वाचा संदर्भ ग्रंथ ठरेल : सुधींद्र कुलकर्णी

कोल्हापूर : " पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाच वर्षांचा काळ म्हणजे केवळ सत्तांतराचा नव्हे तर समाजाचे एकूणच दिशा परिवर्तन करणारा ठरला. या काळातील प्रत्येक धोरणांचं, वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांचं आणि एकूणच देशाच्या वाटचालीचं "मोदीपर्व' या पुस्तकातून समग्र आणि अगदी परखडपणे आकलन मांडले आहे,'' असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि राजकीय विश्‍लेषक सुधींद्र कुलकर्णी यांनी केले. "सकाळ' माध्यम समूहाचे संपादक संचालक व राजकीय विश्‍लेषक श्रीराम पवार यांनी लिहिलेल्या "मोदीपर्व' पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. 

येथील राजर्षी शाहू स्मारक भवनात हाऊसफुल्ल गर्दीच्या साक्षीने हा सोहळा सजला. याच कार्यक्रमात श्री. पवार लिखित "राजपाठ ः वेध राष्ट्रीय राजकारणाचा' आणि "जगाच्या अंगणात ः वेध आंतरराष्ट्रीय घडामोडींचा' या दोन पुस्तकांचेही प्रकाशन झाले. "देशाची राजकीय वाटचाल' या विषयावर श्री. कुलकर्णी यांनी पंचावन्न मिनिटांचा संवाद साधला. ते म्हणाले, ""द्वेषाचं राजकारण, अंधभक्ती यापलीकडे जावून श्री. पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाच वर्षांतील एकूण वाटचाल, निवडणुकीपूर्वी दाखवली गेलेली स्वप्नं आणि प्रत्यक्षात काय झाले, अशा विविध अंगांनी अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. मोदींची सत्ता पुढे असली नसली तरीही भारतीय राजकारणाचा एकूणच अभ्यास करताना "मोदीपर्व' एक संदर्भ ग्रंथ म्हणून महत्वाचे ठरणार आहे.'' 


मोदींनी काही चांगल्या गोष्टी जरूर केल्या. पण, मोदींना विरोध म्हणजे देशद्रोह ही बळावत चाललेली मानसिकता देशाच्या एकूणच लोकशाहीला मारक ठरणार आहे. नोटाबंदीनंतर काळ्या पैशाचं काय झालं, मोदी आणि अमित शहा निवडणुकीत जो खर्च करतात तो मग "व्हाईट मनी' आहे का, काश्‍मीर प्रश्‍नाबाबत सोयीची भूमिका का घेतली गेली, शिक्षण धोरणाचं काय झालं, असे प्रश्‍न गंभीरपणे विचारण्याची वेळ आली आहे. त्याचवेळी कितीही प्रतिमा निर्मिती, प्रतिमा भंजन झाले तरी कुठलाही राजकीय नेता म्हणजे देश नव्हे, ही भुमिका खमकेपणाने घ्यावी लागणार आहे.'' 
"भाजप'ला पर्याय म्हणून कॉंग्रेस पक्ष आता पुढे येतो आहे. पण, केवळ कॉंग्रेसच नव्हे तर मित्रपक्षांनी मिळून संघटितपणे अधिक नेटानं रणनीती आखली तरच तो सक्षम पर्याय होवू शकणार आहे, असेही ते म्हणाले. ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. जे. एफ. पाटील म्हणाले, ""पुस्तकाचे शीर्षक "मोदीपर्व' असे असले तरी ते मोदी यांचा कार्यकाल अशा अर्थानं ठेवलं गेलं आहे. कारण या पुस्तकात कुठल्याही व्यक्तिस्तोमापेक्षा मोदी यांनी घेतलेल्या निर्णय, धोरणांवर सर्व बाजूंनी सखोल विश्‍लेषण मांडलं गेलं आहे.'' 
महापौर सरिता मोरे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. संपादक-संचालक श्रीराम पवार म्हणाले, "2014 च्या निवडणुकीनंतर देशाच्या राजकारणाला वेगळं वळण मिळालं. राजकीय परिभाषा बदलली. नवी संवादशैली आणि त्याभोवती तयार झालेला समर्थकांचा वर्ग, त्याच्या मुळाशी असणारा सोशल मीडियाचा प्रभावी वापर असो किंवा नुकत्याच झालेल्या निवडणुकीत "भाजप'ने "अच्छे दिन' किंवा कॉंग्रेसने धर्मनिरपेक्षता बाजूला ठेवून प्रचाराची रणनीती आखणं, अशा साऱ्या घडामोडींचा वेध पुस्तकातून घेतला आहे.'' दरम्यान, पुस्तकाचे मुखपृष्ठ करणारे नयन बारहाते यांचा यावेळी सत्कार झाला. "सकाळ' प्रकाशनाचे मुख्य व्यवस्थापक आशुतोष रामगिर यांनी आभार मानले. जयश्री देसाई यांनी सूत्रसंचालन केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com