विधानसभेतील कामाची पुढची दिशा संदीप क्षीरसागरांनी दाखवून दिली

विधानसभेतील कामाची पुढची दिशा संदीप क्षीरसागरांनी दाखवून दिली

बीड : सत्तेत असलेल्या मातब्बर काकांच्या विरोधात असल्याने आरोप करणाऱ्या संदीप क्षीरसागर यांच्या गळ्यात आता आमदारकीची माळ पडली आहे. त्यामुळे आता नुसते आरोप करुन भागणार नसल्याची जाणीव त्यांना झाली असून त्याची चुणूक त्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून दाखविली. काका नगराध्यक्ष असलेल्या बीड नगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यासह त्यांनी बीडच्या नागरिकांच्या दृष्टीने महत्वाचे असलेले प्रश्न उपस्थित करुन पुढील पाच वर्षांची दिशा स्पष्ट केली. 

संदीप क्षीरसागर यांनी यापूर्वी पंचायत समितीचे सभापती म्हणून पाच वर्षे आणि जिल्हा परिषदेचे सभापती म्हणून पाच वर्षे काम केलेले आहे. सध्याही पुन्हा जिल्हा परिषद सदस्य असताना ते विधानसभेत विजयी झाले. एकूण साडेबारा वर्षे सभागृहात कामाचा अनुभव असलेल्या संदीप क्षीरसागर यांना हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राज्याच्या सर्वोच्च सभागृहात पाऊल ठेवण्याचा आणि कामाचा अनुभव आला. तशी विधानभवनात पाय ठेवतानाच त्यांनी "राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची उमेदवारी, पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा झंझावाती प्रचारासह मोठ्या संघर्षातून नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात माझ्या बीड मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून मी उपस्थित आहे. ज्या मतदारांनी मला हे भाग्य मिळवून दिले त्यांचा आवाज म्हणून, सेवक म्हणून सदैव कार्यरत राहील.' अशी पोस्ट टाकून त्यांनी भावना व्यक्त केली होती. 

मागच्या तीन वर्षांपूर्वी काका जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या विरोधात बंड पुकारणाऱ्या संदीप क्षीरसागर यांनी एकीकडे संघटन आणि दुसरीकडे आरोपांच्या फैरी अशी कामाची सुरुवात केली होती. काम करतानाच सामान्यांसाठी धाऊन जाण्यामुळे त्यांच्या गळ्यात आमदारकीचीही माळ पडली. परंतु, आमदार म्हणून आता जबाबदारी वाढल्याची जाणीव आणि त्याची चुणूक त्यांनी विजयानंतर दाखवून दिली होती. 

भल्या सकाळी रस्त्यावर उतरुन सामान्यांचे प्रश्न समजावून घेणाऱ्या संदीप क्षीरसागर यांनी जनता दरबार घेत अनेक शेतकऱ्यांच्या प्रश्नांनाही वाचा फोडली. या अधिवेशनाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या जबाबदारीची जाणीव दाखवून दिली. पहिल्याच अधिवेशनात त्यांनी सहा लक्षवेधी दाखल केल्या. त्यात काका नगराध्यक्ष असलेल्या बीड नगर पालिकेतील अनियमितता होत असल्याच्या आरोपासह बीड शहरातील स्वच्छता, बार्शी नाका ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत व जालना रोड ते बायपासपर्यंत शहरातील रस्त्यांचा प्रश्न, गावांना जोडणारा सर्व्हिस रोड व जोड रस्ता, असे प्रश्न मांडले. यापैकी तीन प्रश्नांवर बोलण्याची संधीही त्यांना मिळाली. विशेष म्हणजे त्यांनी अभ्यासपूर्ण प्रश्न उपस्थित केले. एकूणच त्यांनी आपली दिशा स्पष्ट केली असली तरी भविष्यात सभागृह आणि मतदार संघात त्यांची कामगिरी कशी राहते हे पाहणे महत्वाचे आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com