नव्या समीकरणाचे साईड इफेक्ट : भास्कर जाधवांचे मंत्रिपद हुकणार ? 

शिवस्वराज्य यात्रेतही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माझ्यावर टीका केली नाही. इतकेच नाही तर चिपळुणात आपण या सर्वांना भेटलो, असेही भास्कर जाधव सातत्याने सांगत होते.
bhaskar-jadhav-@mla-ncp
bhaskar-jadhav-@mla-ncp

गुहागर  : महाराष्ट्रात नव्याने जुळून आलेली सत्ता समीकरणे राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या आणि निवडून आलेल्या आमदारांसाठी अडचणीची ठरण्याची शक्‍यता आहे.

भाजप-सेना युतीचे राज्य स्थापन झाले असते तर गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांना मंत्रिपद मिळण्याचा मार्ग सोपा होता. मात्र आता आमदार भास्कर जाधव यांची मंत्रिपदाची वाट कशी असेल याची उत्सुकता प्रामुख्याने गुहागर मतदारसंघातील कार्यकर्त्यांना आहे.

महायुतीचे भास्कर जाधव गुहागर विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आले. त्याचवेळी गुहागरला मंत्रिपद मिळणार हे निश्‍चित झाले होते. मात्र निवडणूक निकालानंतर महायुतीचे सरकार राज्यात आलेच नाही. 15 दिवसांच्या घोळानंतर अखेर शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेससोबत राज्यात सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला, तोही फसला.

निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस सोडून शिवसेनेत दाखल झालेल्या आमदारांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीत झंझावाती प्रचार केला. पक्ष सोडून गेलेल्या शिलेदारांवर आसूड ओढले.

राज्यातील निवडणूक निकाल पाहिले तर शिवसेनेकडून राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाल्याचे प्रमाण अधिक आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी सोडून, शिवसेनेतून आमदार झालेल्यांसाठी आज महाराष्ट्रात घडणारी समीकरणे अडचणीची ठरण्याची शक्‍यता जास्त आहे. त्यामुळेच आमदार भास्कर जाधव यांच्या मंत्रिपदाच्या मार्गावर राष्ट्रवादीचे काटे आहेत.

आजही मंत्रिपदाच्या शर्यतीत आमदार भास्कर जाधव आहेत. या शर्यतीत कोणाला जिंकू द्यायचे आणि कोणाला प्रत्यक्ष मैदानात उतरावयचे याचे निर्णय आता शरद पवार करण्याची शक्‍यता अधिक आहे. म्हणूनच मंत्रिपदासाठी भक्कम दावेदार असलेल्या जाधवांना मंत्रिपद मिळणार का, याची उत्सुकता आहे.

राष्ट्रवादीवर थेट टीका टाळली

या निवडणुकीत आमदार भास्कर जाधव यांनी कधीच राष्ट्रवादीवर थेट टीका केली नाही. शरद पवारांना आपण पक्ष का सोडत आहोत हे पत्र लिहून कळविल्याचे त्यांनी जाहीर सांगितले. शिवस्वराज्य यात्रेतही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माझ्यावर टीका केली नाही.

इतकेच नाही तर चिपळुणात आपण या सर्वांना भेटलो, असेही भास्कर जाधव सातत्याने सांगत होते. या साऱ्या कृतींमधून आपले आणि राष्ट्रवादीचे संबंध अजूनही चांगलेच असल्याचे त्यांनी दाखवून दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com