शेतकऱ्यांची लूट : विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना शिवसेना 'आपल्या' भाषेत समजावणार : दानवे   

शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊन त्यांना हक्काच्या पीक विम्याचे पैसे मिळवून देण्यात शिवसेना मध्यस्थी करणार आहे.
Ambadas-Danve
Ambadas-Danve

औरंगाबादः पंतप्रधान पीक विमा योजना सध्या खाजगी विमा कंपन्यांच्या घोळामुळे चांगलीच चर्चेत आहे. मराठवाड्यासह राज्यभरात पीक विम्यापासून लोखो शेतकरी वंचित राहिल्यामुळे विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट आणि फसवणूक झाल्याची तीव्र भावना आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा मिळावा यासाठी आंदोलने सुरू आहेत. शिवसेनेने देखील या प्रश्‍नी आक्रमक भूमिका घेत आता शेतकऱ्यांना पीक विमा मळवून देण्यासाठी मदत केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. 

दुष्काळ आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे सातत्याने शेतकऱ्यांच्या पीक, फळबागांचे आतोनात नुकसान होते. या नुकसानीचा फटका थेट शेतकऱ्यांना बसू नये यासाठी पंतप्रधान पीक विमा योजने अतंर्गत अनेक पीकांचा विमा उतरवला जातो. केंद्र-राज्य सरकार आणि शेतकऱ्यांचा वाटा मिळून पीक विमा उतरवला जातो. परंतु विमा उतरवणाऱ्या खाजगी कंपन्या मात्र पीकांचे नुकसान झाल्यानंतर विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. विरोधी पक्षांनी तर पंतप्रधान पीक विमा योजना म्हणजे देशातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप देखील केला आहे. 

मराठवाड्यातील दुष्काळ आणि पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची होत असलेली लूट या विरोधात आता सत्तेत असलेल्या शिवसेनेने देखील आक्रमक पावित्रा स्वीकारला आहे. जालना येथील चारा छावणीला भेट देऊन शेतकऱ्यांना किराणा साहित्य, जनावरांना पशुखाद्य वाटपाच्या कार्यक्रमासाठी आलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी देखील विमा योजनेच्या प्रश्‍नावर लक्ष केंद्रीत केले आहे. जालन्यात आम्ही विमा कंपन्यांना सरळ करू असा इशारा देताच शिवसेना कामाला लागली आहे. 

औरंगाबाद शिवसेना शाखेच्या वतीने आज शेतकऱ्यांसाठी पीक विमा मदत केंद्र सुरू करण्यात येत आहे. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या संकल्पनेतून हे मदत केंद्र सुरू करण्यात येत असून सायंकाळी 5 वाजता कृषी व जल अभ्यासक डॉ.प्रा. सर्जेरावजी ठोंबरे यांच्या हस्ते उदघाटन  होत आहे. पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना खाजगी कंपन्या दाद देत नाहीत, त्यांची फसवणूक करतात असे प्रकार मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. 

अशावेळी शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊन त्यांना हक्काच्या पीक विम्याचे पैसे मिळवून देण्यात शिवसेना मध्यस्थी करणार आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत या मदत केंद्रात शेतकऱ्यांनी येऊन आपल्या तक्रारी नोंदवल्यानंतर शिवसेनेच्या वतीने संबंधित पीक विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात येणार आहे. पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवून त्यांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने हे मदत केंद्र सुरू करण्यात येत असल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com