मुंबई : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या साथीने सरकार बनविण्यासाठी आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना अखेर 'मातोश्री' वरुन 'सीमोल्लंघन' करावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी ठाकरे यांना वांद्र्याच्या 'हाॅटेल ताज लँड एंड्स' मध्ये जावे लागले.
भाजपने सरकार स्थापनेस नकार दिल्यानंतर सत्ताकेंद्र 'मातोश्री'कडे वळले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांना आपले निवासस्थान सोडून अन्य ठिकाणी जाण्याची वेळ आली. उद्धव व आदित्य ठाकरे यांनी आज दुपारी 'मातोश्री'वरुन बाहेर पडून 'हाॅटेल ताज लँड एंड्स' या ठिकाणी जावे लागले. यापूर्वी युतीच्या काळात 'मातोश्री' हेच सत्ताकेंद्र होते. पण आता ते तसे राहणार नसल्याचे स्पष्ट होते आहे.
यापूर्वी राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता होती, तेव्हाही सत्तेचे केंद्र 'मातोश्री' हेच होते. युतीत कुठलाही तणाव निर्माण झाला की भाजपचे (स्व.) प्रमोद महाजन किंवा (स्व.) गोपीनाथ मुंडे हे नेते शिवसेना प्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांना मनवण्यासाठी 'मातोश्री'वरच जात असत.
या वेळच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी उद्धव ठाकरे यांनी युती तोडण्याबाबत भूमीका घेतली होती. त्यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे देखिल 'मातोश्री'वरच गेले होते. त्यानंतर दोन्ही पक्षांनी लोकसभा निवडणुक युती म्हणून लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आताची वेळ वेगळी आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा शिवसेनेला मिळवायचा आहे. त्यामुळेच त्यांना 'मातोश्री' सोडून बाहेर पडावे लागले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.