शिवसेनेचे मोर्चे आमदारांशिवाय राज्यातील तहसील कार्यालयांवर उद्या धडकणार

 शिवसेनेचे मोर्चे आमदारांशिवाय राज्यातील तहसील कार्यालयांवर उद्या धडकणार

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नावर राज्यातील सर्व तहसील कार्यालयांवर सोमवारी धडक मोर्चे काढण्याचे नियोजन शिवसेनेने केले आहे. राज्यातील सत्तापेच अद्याप न सुटल्यामुळे शिवसेनेचे सर्व आमदार सध्या मुंबईतील एका हॉटेलात आहेत. त्यामुळे आमदारांशिवाय शिवसेनेचे मोर्चे उद्या धडकणार आहेत. मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे पिक व मालाचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात सापडला असतांना त्यांना तातडीने मदत करण्यासाठी राज्यात सरकार मात्र नाही. राज्यपालांनी जाहीर केलेली हेक्‍टरी आठ हजार रुपयांची तुटपुंजी मदत पुरेशी नाही, त्यामुळे बळीराजा आणखीनच अडचणीत सापडला आहे. 

विधानसभा निवडणुका झाल्यानंतर बहुतांश नवनिर्वाचित आमदारांनी सत्कार-समारंभाला फाटा देत पावसामुळे नुकसान झालेल्या शेती व पिकांचे पंचनामे करून घेण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. शिवसेनेचे आमदार यात आघाडीवर होते. औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व आमदारांनी तहसिलदार, कृषी अधिकारी व संबंधित विभागांना तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. 

सिल्लोड-सोयगांव मतदारसंघात तर शिवसेनेने ओला दुष्काळा जाहीर करावा अशी मागणी करत पहिला शेतकरी मोर्चा काढला होता. सध्या राज्यात सरकार स्थापनेवरून भाजप विरुध्द शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस असा संघर्ष उडालेला आहे. एकीकडे सत्तापेच सोडवण्याचे शिवसेनेपुढे आव्हान आहे, तर दुसरीकडे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देऊन त्यांचे प्रश्‍न मार्गी लावण्याला देखील पक्षाने प्राधान्य दिले आहे. राज्यातील सर्व तहसिल कार्यालयांवर एकाच वेळी उद्या (ता.25) शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर धडक मोर्चा काढण्याचे नियोजन शिवसेनेकडून करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्या त्या मतदारसंघातील आमदारांच्या गैरहजेरीत तेथील स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिकच हे मोर्चे काढणार आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यातील धडक मोर्चाचे नियोजन शिवसेनेचे नेते खासदार चंद्रकांत खैरे, आमदार तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केले असून त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात एकाच वेळी शिवसेनेचे धडक मोर्चे तहसील कार्यालयांवर धडकणार आहेत. आमदार जरी मुंबईत अडकले असले तरी आम्ही मोर्चे काढू आणि ते यशस्वी देखील करू असा विश्‍वास अंबादास दानवे यांनी सरकारनामाशी बोलतांना व्यक्त केला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com