मुंबई : मंत्रीमंडळाच्या विस्ताराची वेळ जवळ येत असतानाच महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये नाराजीनाट्य सुरु झाले आहे. शिवसेनेतही काहीजण नाराज असून संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे देखिल मंत्रीमंडळात समावेश न झाल्याबद्दल नाराज आहेत.
सुनील राऊत मुंबईच्या विक्रोळी मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रीमंडळ विस्तारात ग्रामीण भागाला जास्ती स्थान दिले आहे. त्यामुळे राऊत यांची संधी डावलली गेली आहे. राऊत त्यामुळे नाराज असून ते मुंबईबाहेर गेल्याचे वृत्त आहे. सुनील राऊत आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याच्या मनःस्थितीत असल्याचेही सांगण्यात येते. दरम्यान, आपण मंत्रीमंडळ विस्तारावरून नाराज नसल्याचा दावा राऊत यांचे बंधू खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
हे देखिल वाचा : संग्राम थोपटेंची मंत्रीपदाची संधी हुकली; समर्थक नाराज
दुसरीकडे वाईचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील यांना मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने वाई मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाले असून लोणंद ,वाई,महाबळेश्वर नगरपालिकेच्या नगरसेवकांसह तब्बल आठ जिल्हा परिषद सदस्य आपल्या पदांचा राजीनामा देणार असल्याचे वृत्त आहे.
ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे निमंत्रण मित्रपक्षाना दिल्याचा दावा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे एकीकडे करीत असतानाच दुसरीकडे मला अद्याप मंत्रिमंडळ विस्ताराचे साधे निमंत्रणही मिळाले नाही अशी नाराजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. पुणे जिल्ह्यातून काँग्रेसचे संग्राम थोपटे हे देखिल मंत्रीमंडळात समावेश न झाल्याने नाराज आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.