मनोमिलन पदाधिकाऱ्यांपर्यंत मर्यादित; युतीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत कबुली

केंद्र व राज्यात भाजप-शिवसेनेचे संयुक्त सरकार असले तरी गेल्या पाच वर्षांत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांना पाण्यात पाहिले. शिवसेनेने तर 'एकला चलो रे'चा नारा देत युती तुटल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे शिवसैनिक व भाजप कार्यकर्त्यांमध्येदेखील वितुष्ट निर्माण झाले; परंतु निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजप-शिवसेनेची युती जाहीर करण्यात आल्याने भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.
मनोमिलन पदाधिकाऱ्यांपर्यंत मर्यादित; युतीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत कबुली

नाशिक : भाजप-शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्रातील मनोमिलन मेळाव्यात व्यासपीठावर कोणाला बसवायचे यावरून वाद निर्माण होण्याची भीती स्थानिक नेत्यांना वाटू लागल्याने त्या पार्श्‍वभूमीवर नियोजन करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या पाच नेत्यांची कोअर कमिटी तयार करण्यात आली आहे. त्याद्वारेच संयुक्त मेळाव्याचे नियोजन केले जाणार आहे. वरिष्ठ पातळीवर युती झाली असली तरी कार्यकर्त्यांपर्यंत मनोमिलन झिरपले नसल्याची कबुली शुक्रवारी नेत्यांच्या बैठकीत देण्यात आली.

केंद्र व राज्यात भाजप-शिवसेनेचे संयुक्त सरकार असले तरी गेल्या पाच वर्षांत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांना पाण्यात पाहिले. शिवसेनेने तर 'एकला चलो रे'चा नारा देत युती तुटल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे शिवसैनिक व भाजप कार्यकर्त्यांमध्येदेखील वितुष्ट निर्माण झाले; परंतु निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजप-शिवसेनेची युती जाहीर करण्यात आल्याने भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. वरिष्ठ पातळीवर झालेल्या युतीचे मनोमिलन खालपर्यंत झिरपविण्याची गरज असल्याची भावना युतीच्या नेत्यांना वाटू लागल्याने विभागनिहाय संयुक्त मेळावे आयोजित करण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे.

त्या पार्श्‍वभूमीवर १७ मार्चला युतीचा संयुक्त मेळावा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्याचे नियोजन करण्यासाठी शुक्रवारी (ता. १५) पक्षाच्या वसंत-स्मृती कार्यालयात बैठक झाली. या वेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी कार्यकर्त्यांचे मनोमिलन करण्यासाठी बैठक आयोजित करण्याचे आल्याचे स्पष्ट केले.

व्यासपीठावर गर्दीची भीती
उत्तर महाराष्ट्रात आठ लोकसभा मतदारसंघ असल्याने मेळाव्यासाठी एका लोकसभा मतदारसंघातून किमान दोनशे पदाधिकारी येतील. त्यामुळे शिवसेना व भाजपचे प्रत्येकी १०० पदाधिकारी असे एका लोकसभा मतदारसंघातून २०० पदाधिकाऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून, आठ लोकसभा मतदारसंघांचा विचार करता एकूण एक हजार ६०० पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले जाणार आहे. कोणाला निमंत्रित करायचे याचा निर्णय युतीच्या सदस्यांची कोअर कमिटी घेईल.

कोअर कमिटीत राज्यमंत्री दादा भुसे, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख विजय करंजकर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, दत्ता गायकवाड, तर भाजपकडून पालकमंत्री गिरीश महाजन, उपाध्यक्ष वसंत गिते, आमदार बाळासाहेब सानप, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, सचिन ठाकरे, प्रशांत जाधव व जिल्हाप्रमुख दादा जाधव यांचा समावेश करण्यात आला आहे. सर्वच पदाधिकारी मातब्बर असल्याने व्यासपीठावर कोणाला बसवायचे याचा निर्णय कमिटी घेणार असून, त्यानुसारच प्रवेश दिला जाणार आहे. गर्दी होऊन एखाद्याला खाली उतरावे लागले, तर मनोमिलनाला तडा जायला नको म्हणून हे नियोजन आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com