शरद पवारांना दर वेळी माझ्या जातीची आठवण करून द्यावी लागते : देवेंद्र फडणवीस

शरद पवार यांच्याबद्दलचा नवा मुद्दा देवेंद्र फडणवीस यांनी मांडला....
sharad pawar - devendra fadnavis
sharad pawar - devendra fadnavis

पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दर वेळी माझ्या जातीची आठवण करून द्यावी लागते, हे माझ्या नेतृत्त्वाचे यश आहे, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांच्यावर टीका केली.

एका मुलाखतीत त्यांनी हा दावा केला. `राष्ट्रवादी काॅंग्रेसचा पाया गेल्या पाच वर्षांत खिळखिळा केल्याने फडणवीस म्हणून तुमच्याबद्दलचा राग शरद पवारांना आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे स्पष्ट केले.

`फडणवीस` म्हणून प्रश्न विचारल्याची मेख देवेंद्र यांच्या लक्षात आली आणि त्यांनी हा `बोलका` शब्द असल्याचे सांगितले. मी गेल्या पाच वर्षांत काय काम केले अथवा नाही केले. मला लोक नेता मानतात की नाही मानतात, हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. पण पवार साहेब हे पुरोगामी नेते आहेत. ते तसा थेट उल्लेख करू तर शकत नाहीत. पण अप्रत्यक्षरित्या त्यांना माझ्या जातीची आठवण करून द्यावी लागते, हे माझ्या नेतृत्त्वाचे यश आहे. दुसऱ्या गोष्टीची नाही. पण जातीची आठवण त्यांना प्रत्येक वेळी होते. मी ब्राह्मण आहे, हे सर्वांना माहिती आहे. पण दर वेळी काही ना काही निमित्ताने ते माझी जात बाहेर काढत असतात. महाराष्ट्रातील सत्तापेचानंतर दिलेल्या पहिल्या मुलाखतीतही त्यांनी तसा उल्लेख केला. मी महाराष्ट्राच्या राजकीय पटावर नक्कीच माझं स्थान काही कमावलं असेल. अन्यथा मी कोणत्या जातीचा आहे, हे आडून-आडून सांगण्याची गरज पवार साहेबांना पडली नसती, असा टोला त्यांनी लगावला.

पवार साहेब सोडून इतरांनीही तसे केल्याचे मान्य करत आमच्या विरोधकांची आय़ुधे जेव्हा संपतात तेव्हा ते माझ्या जातीवर येतात. पण ते ठिक आहे. जात नेत्यांच्या मनात असते. जनतेच्या मनात नसते, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

अजित पवारांशी भाजपने केलेली हातमिळवणी किंवा पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेली चर्चा यात पडद्यामागे आणि `बिटविन द लाइन` बरेच काही आहे. ते योग्य वेळी बाहेर काढेन, असा इशारा त्यांनी दिला. महाआघाडीचे सरकार फार काळ टिकणार नसल्याचा दावा त्यांनी केला. तीन पक्षांचे सरकार चालल्याचा  इतिहास देशात तरी नाही. मात्र विरोधी पक्षनेता म्हणून सरकारला सुरवातीच्या काळात मी कठोरपणे विरोध करणार नाही. त्यांना योग्य संधी देईल, असेही त्यांनी सांगितले. भाजप हाच खऱ्या अर्थाने ओबीसींचा पक्ष आहे. सर्वाधिक ओबीसी आमदार भाजपचे आहेत. त्यामुळे ओबीसी नेते नाराज आहेत, या म्हणण्यात अर्थ नाही. सत्ता गेल्यानंतर काही गोष्टींचे मंथन होत असते. तसे आता काही नेते विचार मांडत आहेत, असा युक्तिवाद त्यांनी काही नेत्यांकडून होणाऱ्या टिकेबाबत केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com