तरुणांच्या मनातील बंडाचे निशाण ही भविष्यातील  सत्तांतराची नांदी : शरद पवार 

सध्या देशभरात तरुणांच्या मनातील बंडाचे निशाण हे आगामी काळात सत्तांतराची दिशा होऊ शकते असा विश्वास शरद पवार यांनी स्पष्ट केला.
Sharad-Pawar-Modi
Sharad-Pawar-Modi

नागपूर : केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा विधेयका नंतर सोशल मीडिया बंदी कायदा करण्याचा निर्धार केला आहे. हा कायदा सर्वसामान्य भारतीयांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा असल्याने या कायद्याला रोखण्यासाठी ठोस कार्यक्रम राबविणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली.


विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना शरद पवार तीन दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर आले असून आज 'देवगिरी' या अजित पवार यांच्या निवासस्थानी त्यांनी माध्यमांशी अनौपचारिक चर्चा केली त्यावेळी त्यांनी राष्ट्रीय समस्यांसह महाविकास आघाडी या विषयांवर दिलखुलास संवाद साधला.

मोदी सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा करताना देशभरातून त्यांना विरोध होणार नाही अशी अपेक्षा केली होती. मात्र केंद्र सरकारच्या या दाव्याला देशभरातील तरुणांनी छेद दिला असून जो निषेधाचा सूर या कायद्याविरोधात उभा राहिला आहे तो निश्‍चितच पुढील सत्तांतर करण्यास कारणीभूत ठरेल असा इशाराही शरद पवार यांनी यावेळी बोलताना केला.


दरम्यान केंद्र सरकार आता सोशल मीडिया बंदी कायदा आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे पवार यांनी निदर्शनास आणले हा कायदा म्हणजे भारतीय जनतेच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा आहे. अशी टीका करत या कायद्याला रोखण्यासाठी देशभरातून भाजप विरोधी सर्व पक्षांची ठोस भूमिका बांधून त्याविरोधात लढा उभारावा लागेल. या साठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पूर्ण सक्षमतेने या संघर्षात उतरेल असा निर्धार शरद पवार यांनी यावेळी बोलून दाखवला.


सोशल मीडिया बंदी कायदा म्हणजे भारतीयांच्या मूलभूत अधिकारांची गळचेपी असून खाजगी जीवनावर सरकारचा अंकुश ठेवण्याचा प्रयत्न आहे. या कायद्याविरोधात देशभरातील तरुणाई अत्यंत संतापाने विरोध करेल असा विश्वास शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला.


काही कारणास्तव सोशल मीडिया नकारात्मक वाटत असला तरी त्यावर बंदी आणणे हा अंतिम उपाय नाही आणि असा प्रयत्न सरकारने केला तर या सरकारच्या विरोधात देशभरातील भाजप विरोधी शक्ती खंबीरपणे उभ्या राहतील असा इशारा पवार यांनी दिला.


सध्या देशातील अनेक विद्यापीठात नागरिकत्व सुधारणा कायदा विरोधी तरुणांनी जहाल निदर्शने सुरू केली आहेत याचा दाखला देत पवार म्हणाले,  1977 साली देखील तरुणांनी जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन कॉंग्रेस सरकार विरोधात बंड पुकारले होते. तरूणांनी उभारलेल्या त्या बंडाचा शेवट सत्तांतर करूनचं झाला. त्यामुळे सध्या देशभरात तरुणांच्या मनातील बंडाचे निशाण हे आगामी काळात सत्तांतराची दिशा होऊ शकते असा विश्वास शरद पवार यांनी स्पष्ट केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com