इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले पण श्रेय नाही घेतले आणि हे ..!

Sharad_Pawar_Indira_Gandhi
Sharad_Pawar_Indira_Gandhi

कन्नडः बालाकोट हल्ला हा भारतीय सैन्याचे शौर्य आहे. हा हल्ला करण्यासंदर्भात माझ्यासह सर्व पक्षांनी सैन्याला सर्व अधिकार दिले होते. मात्र या सरकारने या हल्ल्याचे श्रेय घेतले.

पूर्वी इंदिरा गांधी यांच्या काळात सैन्याने पाकिस्तानवर हल्ला करून पाकिस्तानचे दोन तुकडे केले . मात्र इंदिरा गांधी यांनी कधीच त्याचे श्रेय घेतले नाही. हे सरकार मात्र सामन्याचे श्रेयही स्वतःच घेतंय , अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे बोलताना केली . 

राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीचे विधानसभा निवडणुकीतील उमेदवार संतोष कोल्हे यांच्या प्रचारासाठी शहरातील गिरणी ग्राउंड येथे सोमवारी शरद पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवारांनी राज्य व केंद्र सरकारवर सडकून टिका केली.  
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांना जिथे जातात तिथे शरद पवारच आठवतात, पाच वर्षांपूर्वी अमित शहा यांना कुणी ओळखतही नव्हते. केवळ मोदींचे मित्र व गुजरातचे म्हणून ते देशाचे गृहमंत्री झाले अशी टिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. मी महाराष्ट्रात व देशात काय केले हे पूर्ण जगाला माहीत आहे, त्यामुळे शहांनी मी काय केले? हे विचारण्याच्या भानगडीत पडू नये, तुम्ही काय केले ते सांगा असा टोला देखील पवारांनी यावेळी लगावला.

शरद पवार म्हणाले, कापसाचा भाव विचारला तर ते 370 कलम पुढे करतात. देशात,राज्यात कारखाने बंद पडले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, बेरोजगारी वाढली, मात्र त्यांचे 370 च चालू आहे. दिवस रात्र,व झोपेतही 370 कलम त्यांना आठवते. 370 कलम रद्द करण्यासाठी काश्‍मीरचे तीन खासदार सोडले तर आमच्यासह सर्व पक्षांनी पाठिंबा दिला होता. 370 कलम जसे रद्द केले तसे 371 कलमही रद्द करावे अशी आमची मागणी आहे.

कधी नव्हे ते कांद्याला दोन पैसे मिळू लागताच या सरकारने निर्यात बंद करून भाव पाडले. मी माझ्या काळात दिल्लीकरांचा विरोध पत्करून कांद्यावरील सर्व निर्बंध हटवले होते. विरोधी पक्षात असतांना मुख्यमंत्री कापसाला 7 हजार रुपये भावाची मागणी करत होते. आता दिला का भाव असा सवालही पवारांनी केला. कन्नड तालुक्‍याची ओळख आता अद्रक,टोमॅटो उत्पादक,पर्यटन अशी न राहता महाराष्ट्रातील सर्वात खराब रस्त्यांचा तालुका अशी झाली आहे. येथे प्रक्रिया उद्योग उभे राहिले नाही, तरुणांना रोजगार नाही, शेतकरी अडचणीत असल्याचेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com