'एमजीएम'साठी शरद पवारांनी आपली आमराई गहाण ठेवली :अंकुशराव कदम

पवार साहेबांनी आम्हाला पुण्याला बोलावले. थेट महाराष्ट्र बॅंकेत नेले आणि चहा घेईपर्यंत आम्हाला दहा लाखासाठी बॅंक गॅरंटीचे पत्र मिळाले. हे कसे झाले हे जाणून घेतले तेव्हा कळाले, की शरद पवार साहेबांनी आपल्या जमीनीचे, आमराईचे कागदपत्र बॅंकेकडे गहाण ठेवले होते.
sharad-pawar-baburao-kadam-
sharad-pawar-baburao-kadam-

औरंगाबादः महात्मा गांधी मिशनच्या पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उभारणीसाठी दहा लाख रुपयांची गरज होती. आमच्याकडे फक्त शंभर रुपये होते. शरद पवारांकडे मदत मागितली, तेव्हा त्यांनी पुण्याला बोलावून घेतले. महाराष्ट्र बॅंकेत नेले, मॅनेजरकडे बसून चहा घेईपर्यंत आम्हाला बॅंक गॅरंटीचे पत्र मिळाले. 


हे कसे झाले याचा शोध घेतला तेव्हा, पवार साहेबांनी आपल्या आमराईची कागदपत्र बॅंकेकडे गहाण ठेवल्याचे आम्हाला कळाले. एमजीएमचा आज जो वटवृक्ष झाला आहे, त्याचे बीज रोवण्याचे काम शरद पवारांनी केले, आम्ही ते केवळ सांभाळत आहोत अशा शब्दांत अंकुशराव कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

महात्मा गांधी मिशन संस्थेचा 37 वा वर्धापनदिन आणि विश्‍वस्त अंकुशराव कदम यांचा अमृत महोत्सव सोहळा या निमित्ताने शरद पवार यांच्या हस्ते आज त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देतांना कदम यांनी पहिल्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या उभारणीपासून तर आतापर्यंतच्या एमजीएम संस्थेच्या प्रवासाच्या अनेक आठवणी सांगितल्या.

अंकुशराव कदम म्हणाले, महात्मा गांधी मिशनचा आज जो मोठा वटवृक्ष झाला आहे, त्याचे बीज शरद पवारांनी दिलेले आहे. आम्ही फक्त त्याचे संगोपन करतो आहोत. कमलकिशोर कदम राजकारणात होते, आमदार, मंत्री असतांना इंजिनिअरिंग कॉलेजाच्या प्रस्तावाचे पत्र त्यांनी दिले आणि काय करायचं ते बघा असे सांगितले. 


कॉलेज तेही अभियांत्रिकेचे सुरू करणे ही छोटी गोष्ट नव्हती. पण गंगाधर पाथ्रीकरांसारखे महत्वाकांक्षी सोबती साथीला होते. जागेचा प्रश्‍न होता, तेव्हा काही मित्रांनी आपल्या जमीनीचे सातबारे आणून दिले, जागेचा प्रश्‍न सुटला पण बांधकामासाठी दहा लाखांची गरज होती.

काका शामराव कदमांकडे गेलो मदत मागितली, इंजिनिअरिंग कॉलेज काढायचे असे सांगितले तर ते म्हणाले, आधी बालक मंदीर, मग शाळा आणि त्यानंतर कॉलेज काढा. तिथून कमलकिशोर कदमांकडे गेलो, त्यांना अडचण सांगितली आणि त्यांनी शरद पवारांना फोन लावला.

पवार साहेबांनी आम्हाला पुण्याला बोलावले. थेट महाराष्ट्र बॅंकेत नेले आणि चहा घेईपर्यंत आम्हाला दहा लाखासाठी बॅंक गॅरंटीचे पत्र मिळाले. हे कसे झाले हे जाणून घेतले तेव्हा कळाले, की शरद पवार साहेबांनी आपल्या जमीनीचे, आमराईचे कागदपत्र बॅंकेकडे गहाण ठेवले होते. एमजीएम संस्थेचे बीज रोवण्याचे काम शरद पवार साहेबांनी केले, ते बीज सांभाळण्याचे काम आम्ही करतोय अशा शब्दांत अंकुशराव कदम यांनी पवारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

पवारांचे अंदाज शंभर टक्के खरे असतात

राजकारणात शरद पवार यांचे अंदाज शंभर टक्के खरे ठरतात, कमलकिशोर कदम शंकरराव चव्हाणांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवत असतांना " तुमचा पराभव होणार हे त्यांनी आधीच सांगितले होते' अशी आठवण देखील यावेळी अंकुशराव कदम यांनी सांगितली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com