भंडारदराच्या पाण्याचा तंटा शरद पवारांनीच सोडविला होता

आदिवासींच्या 9 टक्के बजेटमध्ये स्थान देण्याबाबतचा कायदा हा शरद पवार यांच्यामुळेच होऊ शकला. या कायद्यामुळे आदिवासींसाठी भरीव निधी मिळाला. -मिनानाथ पांडे
sharad-Pawar-
sharad-Pawar-

नगर  : ``भंडारदरा धरणाच्या पाण्याचा तंटा बरेच दिवस चालू होता. अकोले, संगमनेर विरुद्ध राहाता, लोणी व श्रीरामपूर असा तो वाद होता. त्या वेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीच हा तंटा मिटवून अकोले व संगमनेरला 30 टक्के पाणी दिले. अकोल्यातील बागायती भाग बनविण्यात पवार यांचेच योगदान आहे,`` अशा आठवणी अकोले येथील अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक मिनानाथ पांडे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने `सरकारनामा` शी बोलताना सांगितल्या.

पांडे हे शरद पवार यांचे जुने कार्यकर्ते आहेत. राष्ट्रवादीच्या स्थापनेपुर्वीपासून ते पवार यांच्यासोबत आहेत. अकोले तालुक्याच्या दाैऱ्यावर पवार आले की पांडे सोबत असायचेच. याबाबत बोलताना ते म्हणाले, ``शरद पवार यांच्या सोबत मी अनेक वेळा दाैऱ्यावर असायचो. अकोले तालुक्यात आल्यावर अनेकदा ते विविध विषयांवर चर्चा करीत. शेतकऱ्यांना पाणी मिळावे, शेतकरी सुखी व्हावा, म्हणून त्यांचे कायम स्वप्न असायचे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आम्ही त्यांचे मार्गदर्शन घेत असू. ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी तालुक्याच्या विकासासाठी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कामगिरी केली आहे.`` 

भंडारदराच्या पाण्याच्या तंट्याबाबत पांडे म्हणाले, ``भंडारदरा धरणाचे पाणी अकोले, संगमनेर तालुक्याला हक्काने मिळावे, यासाठी शेतकऱ्यांचा लढा उभा राहिला. संगमनेर, अकोले विरोधात राहाता, लोणी व श्रीरामपूर असा तो तंटा होता. ओझरच्या खालील शेतकरी म्हणायचे अकोलेसाठी पाणी उचलू द्यायचे नाही. आणि अकोले येथील शेतकरी मात्र आम्हाला हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, या मागणीवर ठाम होते. हा वाद शरद पवार यांच्याकडे गेला. त्यांनी अकोले व संगमनेरला 30 टक्के पाणी उचलण्याचा अधिकार दिला. त्यामुळे अकोले तालुका बागायती झाला.``

... आणि निळवंडेचे काम मार्गी लागले

निळवंडेचे काम शरद पवार यांच्यामुळेच मार्गी लागले हे सांगताना पांडे म्हणाले, ``निळवंडे धरणासाठी प्रारंभी म्हाळादेवी येथील जागा निवडली होती. नंतर त्यात बदल करून कुकडवेढेला भूमिपूजन झाले. त्यात बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात जात होते. त्यामुळे धरणाचे काम सुरू होत नव्हते. शेतकऱ्यांच्या अडचणी एकूण घेत शरद पवार यांच्या सुचनेनुसार हे काम निळवंडे येथे सुरू केले. निळवंडेच्या कामात ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड, मंत्री बाळासाहेब थोरात यांचेच योगदान आहे. हे काम पवार यांच्या मार्गदर्शनामुळेच मार्गी लागले. त्यांच्यामुळेच अकोेले तालुक्याला पाणी मिळाले.``

... अन अगस्ती कारखान्यास मंजुरी मिळाली

अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीसाठी पवार यांचे मोलाचे सहकार्य मिळाले, हे सांगताना पांडे यांनी जुन्या आठवणी जाग्या केल्या. ते म्हणाले, ``अकोले तालुक्यात अगस्ती साखर कारखाना व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू होते. अगस्तीची उभारणीसाठी सहकार्य, मंजुरीसाठी प्रयत्न हे सर्व शरद पवार यांच्यामुळेच झाले. मी अगस्ती कारखान्याचा सुरुवातीपासून संचालक आहे. या सर्व प्रक्रीया माझ्यासमोर झाल्या. पवार यांच्यामुळेच कारखाना उभा राहू शकला.``

आदिवासींना 9 टक्के पवारांमुळेच

आदिवासींच्या 9 टक्के बजेटमध्ये स्थान देण्याबाबतचा कायदा हा शरद पवार यांच्यामुळेच होऊ शकला. या कायद्यामुळे आदिवासींसाठी भरीव निधी मिळाला. योजना मार्गी लागू शकल्या. आदिवसींचे कल्याण करण्यात पवार यांची महत्त्वाची भूमिका आहे, असे मत पांडे यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com