भाजप -शिवसेना युती 2014 प्रमाणे तुटणार ? 180 जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य

भाजप -शिवसेना युती 2014 प्रमाणे तुटणार ? 180 जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीत स्वबळावर 180 जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने आखले असून यासाठी प्रत्येक मतदारसंघात विजयी उमेदवारावर लक्ष केंद्रीत करण्याची रणनिती भाजपने आखली आहे. स्वबळाचे स्पष्ट संकेत भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत दिले गेले आहेत. त्यामुळे 2014 प्रमाणे शिवसेनेसोबतची युती तुटणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागले आहे. कार्यकारिणीच्या बैठकीतील भाजपच्या नेत्यांच्या जाहीर वक्‍तव्यांमुळे युतीचे दोर कमजोर झाले असून आयारामांच्या भाजपमध्ये येण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 

भाजप-शिवसेनेची युती 2014 मध्ये विधानसभेला तुटली होती. तीन पायांची शर्यत नको, अशी टिप्पणी करीत भाजपचे माजी आमदार मधु चव्हाण यांनी युती तोडून स्वबळावर लढण्याचे आवाहन त्यावेळच्या कार्यकारिणीत केले होते. त्यानंतर शिवसेना-भाजपमध्ये जागा वाटपावरून घोडे अडून युती तुटली आणि भाजपने स्वबळावर 123 जागा जिंकून सरकार स्थापन केले तर शिवसेनेला 63 जागावर समाधान मानावे लागले. त्यानंतर शिवसेना सत्तेत सहभागी झाली. तर 2019 च्या लोकसभेला भाजपने शिवसेनेच्या नाकदु-या काढत युती केली. मात्र विधानसभेला स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहे. 

शिवसेना-राष्ट्रीय समाज पक्ष, रिपाई, शिवसंग्राम आणि शिवसेना, रयत क्रांती शेतकरी संघटना अशा महायुतीने विधानसभा निवडणूक लढवणार असे भाजपचे नेते जाहीरपणे बोलत असले तरीही स्वबळावर निवडणूक लढल्यास आपली एकहाती सत्ता येईल असे भाजपमधील काही नेत्यांना वाटत आहे.त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री भाजपचाच झाला पाहिले यावर हे नेते ठाम आहेत. कार्यकारिणीच्या भाषणात देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीच पुन्हा मुख्यमंत्री होणार अशी ग्वाही कार्यकर्ते, पदाधिकारी यांना दिली आहे. 

कार्यकारिणीची बैठकीच्या ठिकाणी मी परत येईन, अशा आशायाचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे फलक लागले आहेत. तर भाजपच्या राज्य प्रभारी सरोज पांडे यांनी कार्यकर्त्यांनी 288 जागांवर भाजपचे उमेदवार आहेत, असे समजून कामाला लागण्याचे आदेश दिले. भाजपचे नुतन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील 288 जागावर भाजपच लढत आहे, असे समजून भाजपचे पदाधिकारी यांनी काम करावे, असे स्पष्ट म्हटले आहे. भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी. नडडा यांनी युतीबाबत कार्यकर्त्यांनी चिंता करू नये. बुथपातळीपासून भाजपला ताकदवान बनावा असा इशारा दिला आहे. भाजपच्या या भुमिकेमुळे भाजपमध्ये येण्यासाठी रांगेत असलेल्या आयाराम सुखावले असल्याचे चित्र आहे. 

राज्य प्रभारी सरोज पांड े- भाजप कोणत्याही परिस्थितीत 288 जागा जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री भाजपचाच होणार आहे. युतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री अमित शहा निर्णय घेतील. 

 मुख्यमंत्री जनता ठरवीत असते- मुख्यमंत्री 
मी कोणत्याही परिस्थितीत पुन्हा येईन, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे झालेल्या बैठकीत भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना दिली. याबाबतची पोस्टर्स या बैठकीच्या मार्गावर लावलेली होती. तसेच मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले की महाराष्ट्रातील जनता हीच माझी दैवी शक्‍ती आहे.माझयाकडे गमावण्यासारखे काही नाही. ना कारखाना, ना कोणती संस्था. आरक्षण, शेतकरी यांचे प्र'श्‍न सोडवू शकलो.आता नव्याने मैदानात उतरायचे आहे.ही निवडणूक युतीतच लढणार आहे. मुख्यमंत्री जनता ठरवीत असते. माध्यमाकडे लक्ष देउ नका.मी आधिच सांगितले आहे. मी पुन्हा येईन. मी केवळ भाजपचा नाही तर सेनेचा, रिपाईचा, रासपाचा अशा सर्व पक्षाचा मुख्यमंत्री आहे. 
 220 जागा महायुतीच्याच येणार- चंद्रकांत पाटील 
विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या 220 जागा येतील, असा विश्‍वास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्‍त केला. कार्यकर्त्यांना संबोधताना ते म्हणले की भाजप कार्यकर्त्यांनी 288 जागावर कामाला लागा. युतीबाबत चिंता करू नका. युतीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. संघटनात्मक बांधणीत आपण कमी नाही. आपले थेट जनतेशी घटट नात निर्माण झाले आहे.बूथ रचना आणि पन्ना प्रमुख या भाजपच्या संघटनात्मक रचनेमुळे लोकसभा निवडणुकीत चमत्कार करून दाखवला आहे. विधानसभा निवडणुकीतही आपण असाचा चमत्कार करून दाखवून, असेही ते म्हणाले. 

बैठकीला केंद्रीय मंत्री गडकरी यांची दांडी 
राज्यात विधानसा निवडणुकीपुर्वी होणा-या या महत्वाच्या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उपस्थित नव्हते. पुर्वनियोजित कार्यक्रमामुळे गडकरी उपस्थित राहू शकले नाहीत, असे सांगितले गेले तरीही गडकरी यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेत होते. तसेच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या देखील उपस्थित नव्हत्या. त्या नियोजित कार्यक्रमामुळे परदेशात गेल्या आहेत, तसेच तब्येत ठिक नसल्यामुळे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार या बैठकीला उशीरा पोहचले असा खुलासा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com