स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट, प्रदेश उपाध्यक्ष सयाजी मोरे यांनी संघटना सोडली

स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट, प्रदेश उपाध्यक्ष सयाजी मोरे यांनी संघटना सोडली

इस्लामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटना ही जातीयवादाने पछाडलेली संघटना असून या संघटनेत आता बहुजन समाजातील लोकांचा फक्त वापरच केला जातो. त्यामुळे आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील पदांचा राजीनामा देऊन संघटनेला सोडचिठ्ठी देत असल्याची घोषणा स्वाभिमानीचे प्रदेश उपाध्यक्ष सयाजी मोरे व सांगली जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी आज पत्रकार बैठकीत केली. 

ते म्हणाले, ही संघटना आता शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर चळवळ करणारी संघटना उरलेली नाही. यात फक्त व्यक्तीकेंद्रीत व जात केंद्रीत काम चालते. याचा आम्हाला विट आला. बहुजन समाजातील एखादा युवक या संघटनेत नावारुपास यायला लागला की त्याला नियोजनपूर्वक बदनाम केले जाते. बदनाम करण्यासाठी या संघटनेत राजू शेट्टींच्या आदेशावर चालणारा एक गट कार्यरत आहे. 

बहुजन समाजातील लोकांची व युवकांची डोकी भडकावून त्यांना चुकीच्या मार्गाला नेत आपनास हवे तसे कार्य सिध्दीस नेत आपली राजकीय पोळी भाजण्याचा नियोजन बध्द कार्यक्रम सुरु असतो. त्यामुळे बहुजन समाजातील लोकांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत रस्त्यावर उतरुन टायर फोड, गाड्या फोड, जाळपोळ कर असे आंदोलन कृपया करु नये. अशी माथी भडकून घेऊन अनेक लोकांच्या संसाराची राख रांगोळी झाली आहे. अनेकांच्यावर शेकडो गुन्हे दाखल आहेत. जनावरे विकून, शेती गहाणवट ठेवून कोर्ट, कचेऱ्या, पोलीस स्टेशन या भानगडी कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे युवक-युवतींनी या संघटनेतील राजकीय पोळी भाजणाऱ्या नेत्यांच्या नादाला लागू नये. आपले करिअर बघावे असा सल्लाही या नेत्यांनी दिला. 

ते म्हणाले, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार उल्हास पाटील, शिवाजीराव माने, पंजाबराव पाटील, अभिजीत पाटील यांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवून संघटनेसाठी एकनिष्ठ होऊन काम केले. परंतू त्यांनाही देण्यात आलेली वागणूक धक्कादायक होती. राजकीय मतभेत समजू शकतो. परंतू त्यांच्यापासून लांब गेला की तो गद्दार, बाद, अशी त्यांची भावना आहे. पुढील राजकीय वाटचाल कार्यकर्त्यांशी चर्चा करुन ठरवू. यावेळी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष प्रविण पाटील, युवा आघाडीचे अभिमन्यू पाटील, श्रीरंग माने उपस्थित होते. 
बहुजन समाजातील नेत्यांच्या पाठीशी राहू.. 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेत एका जातीचेच प्राबल्य आहे. यात बहुजन समाजातील दुसरी व्यक्ती पुढे येऊ लागला की त्यास पध्दतशीर बदनाम करुन त्याचे खच्चीकरण केले जाते. स्वाभिमानीतून बाहेर पडलेल्या सदाभाऊंनाही नियोजनपुर्व कट करुन बदनाम करण्यात आले. संबध नसतानाही कोणत्याही प्रकरणाशी जोडून त्याचे खच्चीकरण करण्याचे काम सुरु आहे. यापुढे स्वाभिमानीचा नाद सोडून आम्ही बहुजन समाजातील कोणत्याही नेत्यावर चुकीचा आरोप झाला तर त्याच्या पाठीमागे ठामपणे उभे राहू, असे सयाजी मोरे यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com