महाराज येणार नाहीत, पण जनता त्यांचा कडेलोट करेल! 

दुपारी अडीचच्या सुमारास श्री.पाटील यांचे कॉंग्रेस कमिटीत आगमन झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचा जयघोष करून परिसर दणाणून सोडला. काही कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून खांद्यावर घेतले, तेथून व्यासपीठापर्यंत त्यांना उचलूनच आणण्यात आले.
महाराज येणार नाहीत, पण जनता त्यांचा कडेलोट करेल! 

कोल्हापूर : ज्या शिवाजी महाराजांचे नाव घेऊन युती सरकार सत्तेत आले, त्याच छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळवलेले किल्ले भाडे देऊन त्यांचा इतिहास संपवण्याचे षडयंत्र सरकारने रचल्याचा आरोप कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केला. 

आम्ही चुकलो तर शिवाजी महाराजांनी आमचा कडेलोट करावा असे हे लोक म्हणत होते, महाराज त्यासाठी येणार नाहीत पण जनतेत मात्र तुमचा कडेलोट करण्याची ताकद आहे, असा टोलाही श्री. पाटील यांनी लगावला.

कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर श्री. पाटील यांनी आज कार्यालय प्रवेश केला. यावेळी आयोजित मेळाव्यात त्यांनी युती सरकारवर कडाडून टीका केली.

श्री. पाटील म्हणाले,"शिवाजी महाराजांचे नांव घेऊन सत्तेवर आलेल्या या सरकारने गड, किल्ल्यासाठी हजारो कोटींची घोषणा केली, पण प्रत्यक्षात किती मिळाले हे माहित नाही. पण ज्या शिवाजी महाराजांमुळे स्वराज्य अबाधित राहीले, ज्या गड किल्ल्याचा इतिहास ऐकला तर आमची मान ताठ होते, अभिमानाने ऊर भरून येतो, तेच किल्ले लग्नकार्य आणि हॉटेलसाठी भाड्याने देण्याचा घाट घालून महाराजांचा इतिहासच पुसण्याचे षडयंत्र सुरू आहे. या गोष्टीचा करावा तितका निषेध कमी आहे. बोलयाचे एक आणि करायचे एक हे सरकारचे धोरण जुनेच आहे. आता सांगतात वर्ग 1 च्या किल्ल्यांना हात लावणार नाही पण त्याची खात्री कोण देणार ? जसा उंट तंबूत घुसतो व तंबूच ताब्यात घेतो, तसे या भाजपावाल्यांचे आहे.'

विरोध पक्ष कुठे आहे असे म्हणणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की विरोधी पक्ष आहे आणि सेना, भाजपाविरोधात लढायची ताकद आमच्यात आहे, असे सांगून श्री. पाटील म्हणाले,"हे सरकार बोगस आहे. या सरकारविरोधात आंदोलन करण्याची हजारो कारणे आपल्याकडे आहेत. आज एमपीएससी पास झालेल्या उमेदवारांचे हाल काय आहेत. उद्याच्या या अधिकाऱ्यांना भीक मागायची वेळ येते. सन्मानाने खुर्चीवर बसणाऱ्या या भावी अधिकाऱ्यांचे प्रचंड हाल सुरू आहेत. राज्यातील उद्योजकांची परिस्थिती वाईट आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात अनेकजण मुख्यमंत्री झाले पण त्यांनी आपल्या भागाचा कधी विचार केला नाही. पण या सरकारने विदर्भासाठी वेगळा वीज दर आकारून राज्यातच वीज दराची स्पर्धा निर्माण केली, त्यातून उद्योजक कर्नाटकात जात आहे ही चुकीची गोष्ट आहे.'
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com