सातारा जिल्हा : राष्ट्रवादीचा बालेकिल्ला भाजपचे 'टार्गेट'

2014 च्या विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यात सर्व पक्ष स्वतंत्र लढले तरी राष्ट्रवादीने पाच आमदार निवडून आणले. कॉंग्रेसचे दोन आणि शिवसेनेचा एक आमदार निवडून आला. पण लोकसभा निवडणुकीत केंद्रात पुन्हा मोदी सरकार सत्तेवर आल्यामुळे आता भाजपने सातारा जिल्हा टार्गेट करून येथील राष्ट्रवादीचे वर्चस्व मोडीत काढण्याचा निर्धार केलाय. त्यासाठी महसूल मंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतील दिग्गजांना भाजपमध्ये घेण्याचा सपाटा लावलाय. त्यामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अबाधित राहणार का, असा प्रश्‍न आहे.
सातारा जिल्हा : राष्ट्रवादीचा बालेकिल्ला भाजपचे 'टार्गेट'

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच जिल्ह्यातील राजकारणात वेगवान हालचाली होत आहेत. साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना भाजपमध्ये घेऊन भाजपने राष्ट्रवादीला धक्का दिलाय. त्यांच्यानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हेही भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांनी भाजपकडे वाई, फलटण आणि कुलाबा मतदारसंघांची मागणी केली आहे. यातून ते जिल्ह्यातील तीन मतदारसंघांवर आपले प्रभुत्व दाखवत सभापतीपद कायम राखण्याची खेळी खेळत आहेत. या महिनाअखेरीस त्यांचा प्रवेश होण्याची शक्‍यता आहे. 

कॉंग्रेस निष्प्रभ 
मुळात भाजपचे उमेदवार हे कॉंग्रेस, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले आहेत. त्यामुळे शिवसेना आणि भाजप जिल्ह्यात आयात उमेदवारांच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला तोडण्याच्या प्रयत्नांत आहे. जिल्ह्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी असली तरी कॉंग्रेसची ताकद घटू लागली आहे. सध्या कॉंग्रेसची अवस्था सेनापती नसलेल्या फौजेप्रमाणे आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचे पक्ष संघटनेकडे लक्ष नाही, तर आमदार जयकुमार गोरेंना पक्ष संघटनेत फारसा रस दिसत नाही. 

सातारा जावली मतदारसंघात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यामुळे येथील इच्छुक असलेले भाजपचे नेते दीपक पवार यांचा पत्ता कट झाला आहे. त्यांना पश्‍चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष पद देऊन राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला साताऱ्यात उमेदवार नसला तरी त्यासाठी कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदेंचा पर्याय होऊ शकतो. पण खासदार उदयनराजे भोसले कोणाचे नाव सुचविणार यावर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरणार आहे. 

वाईची लढत लक्षवेधी 
वाई-महाबळेश्‍वर-खंडाळा मतदारसंघात यावेळेस कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मदन भोसले इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून आमदार मकरंद पाटील रिंगणात असणार आहेत. पण आता विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनीही येथून लढण्याची इच्छा व्यक्त केल्याने मकरंद पाटलांची अडचण होणार आहे. या मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना भोसलेंनी भाजपमध्ये घेतलंय. त्यामुळे भाजप विरूद्ध राष्ट्रवादी अशीच लढत होणार आहे. पण भाजपचा उमेदवार कोण मदन भोसले की रामराजे यावर लढतीचे चित्र ठरेल. 

कऱ्हाड दक्षिणेत यावेळेस कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजपचे नेते अतुल भोसले यासह विलासराव पाटील उंडाळकरांचे पुत्र उदयसिंह पाटील रिंगणात असतील. येथे आमदार बाळासाहेब पाटील आणि उंडाळकर गटाची भुमिका महत्वपूर्ण ठरेल. 

कोरेगावांकडे लक्ष 
कोरेगाव मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला असला तरी येथून भाजपच्या महेश शिंदेंनी तयारी चालवली आहे. राष्ट्रवादीकडून आमदार शशिकांत शिंदेंना ऐनवेळी सातारा जावलीतून पाठविल्यास कोरेगावात राष्ट्रवादीला उमेदवार शोधावा लागेल. येथून रोहित पवार किंवा अजित पवार यांच्या नावाची चर्चा आहे. पण आमदार शिंदे हा मतदारसंघ सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी विरूद्ध भाजप की शिवसेना यावरच येथील गणित अवलंबून आहे. 

फलटण मतदारसंघ राखीव असून, येथे राष्ट्रवादीचे आमदार दीपक चव्हाण तिसऱ्यांदा इच्छुक असले तरी भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर कोणाला उमेदवारी देणार यावर सर्व गणिते अवलंबून आहेत. शिवसेनेने दिगंबर आगवणेंसाठी गळ टाकलाय. रामराजे नाईक-निंबाळकर यांचीही भुमिकाही येथे महत्वाची आहे.राष्ट्रवादीला येथे सक्षम उमेदवार देता येणार का, यावर येथील निवडणुकीचे चित्र अवलंबून राहणार आहे. 

माण मतदारसंघात सर्वपक्षीय आघाडीच्या माध्यमातून कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे हटावचा नारा दिलाय. पण या आघाडीपासून दूर राहात आमदार गोरेंचे बंधू शेखर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. ते येथून निवडणूक लढणार आहेत. आता युतीच्या वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने सर्वपक्षीयांच्या आघाडीचा उमेदवार कोण हेही महत्वाचे आहे.

या मतदारसंघात तीन उमेदवार रिंगणात राहिल्यास जयकुमार गोरे हॅटट्रीक करू शकतील. त्यांच्यासाठीही भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्या भुमिकेवर येथील गणिते अवलंबून असतील. पाटणला पारंपारिक विरोधकांत लढत होते. यावेळेसही शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे सत्यजितसिंह पाटणकर यांच्यातच लढत होणार आहे. 

देसाई यांनी सत्तेच्या माध्यमातून केलेली कामे व ठेवलेला संपर्क पाहता त्यांचे पारडे जड आहे. त्यामुळे येथील जनता कोणाच्या पारड्यात यश टाकणार याची उत्सुकता आहे. एकुणच राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात यावेळेस चार आमदार निवडून आणण्याचा विडा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी उचललाय. त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साथ आहे.

पक्षाची ताकद वाढावी, यासाठी युतीच्या माध्यमातून जिल्ह्यात तब्बल पाच राज्यमंत्री पदे दिली आहेत. यात भाजपच्या तीन आणि शिवसेनेच्या दोन राज्यमंत्री पदाचा समावेश आहे. या ताकदीच्या जोरावर युती साताऱ्याचा बालेकिल्ला तोडण्याचा प्रयत्न करणार आहे. शिवेंद्रसिंहराजेंच्या माध्यमातून भाजपने राष्ट्रवादीला खिंडार पाडलंय. आता प्रत्यक्ष निवडणुकीत किती आमदार निवडून आणण्यात भाजप व शिवसेना यशस्वी होणार हे महत्वाचे आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com