पुणे : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर टीका करणारे भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांचा पंकजा यांचे मामा प्रकाश महाजन यांनी समाचार घेतला असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खूष करण्यासाठी काकडे अशी वक्त्व्ये करत असल्याची टीका केली.
जातियवादामुळे आणि त्यांच्या कर्तुत्त्वामुळेच पंकजा यांचा परळीत पराभव झाला, असा आरोप काकडे यांनी केला होता. त्यांची परळीची जागा धोक्यात आहे, याचा इशारा मी त्यांचे पती अमित पालवे यांच्याकडे दिला होता. मात्र त्यांनी दुर्लक्ष केले, असा दावाही त्यांनी केला.
पंकजा मुंडे यांनी काल गोपीनाथ गडावर भाजपच्या नेतृत्त्वाला इशारा दिला होता. त्याबद्दल काकडे यांनी आक्षेप घेत पंकजा यांच्यावर टीका केली. त्यांच्या मतदारसंघात जातियवाद होत असल्याच्या तक्रारी मी त्यांच्या कानावर घातल्या होत्या, असे त्यांनी चॅनेलवरील चर्चेत सांगितले.
पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांनी काकडे यांच्या बोलण्यावर आक्षेप घेत पंकजा यांचा एकदा पराभव झाला म्हणून तुम्ही मुंडेच्या कार्यक्षमतेवर आक्षेप घेता का, असा सवाल केला. फडणविसांना चांगल वाटावं म्हणून तुम्ही पंकजाविषयी असे बोलता, असा आरोपही त्यांनी केला.
काकडे स्वतःला गोपीनाथ मुंडे यांचे मित्र म्हणवतात आणि पंकजा यांच्यावर जाहीर टीका करतात. पंकजा या पक्ष सोडून कोठूनही जाणार नाहीत. तरीही त्यांच्याविरोधात अपप्रचार केला जात असल्याचे सांगत महाजन यांनी काकडे हे स्वतः कसे निवडून आले आहेत, हे पाहावे. पंकजांमुळे अनेक आमदार निवडून आले आहेत. त्यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेचा पक्षाला फायदाच झाला होता. तरीही तिला अनेक अपमान पचवावे लागले. तिचे जलसंधारण खाते ती परदेशात असताना काढून घेतले. तिची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. काकडे यांच्यासारखी मंडळी ती कार्यक्षम मंत्री नसल्याचा आरोप करतात. सर्वाधिक गर्दी हे पंकजा यांच्या कार्यालयात असायची. कामे होत असल्याशिवाय लोक गर्दी करत होते का, असा सवाल महाजन यांनी केला.
काकडे यांना पंकजा यांची एवढीच काळजी होती तर त्यांनी जाहीरपण बोलण्याऐवजी फोन करायचा होता, अशी अपेक्षा महाजन यांनी व्यक्त केली.
याला प्रत्युत्तर देताना काकडे म्हणाले की पंकजा यांच्या हितासाठीच मी हे बोललो आहे. त्या पक्षाच्या चौकटीत राहून काम करणार असतील तर मी त्यांच्यासोबत राहीन. मात्र पक्षावर टीका करून काही होणार नाही, हेच मला त्यांना समजून सांगायचे होते.
ज्यांना मतदारसंघ सांभाळता आला नाही, ते महाराष्ट्रात फिरुन काय दिवे लावणार, अशी टीका काकडे यांनी केली होती. पंकजा यांची विधाने भाजपच्या खऱ्या कार्यकर्त्याला दुखावणारी आहेत. पाच वर्षे तुम्ही सत्तेत होता तेव्हा तुम्हाला काही काम करता आलं नाही. मग महाराष्ट्रात फिरुन तुम्ही काय दिवे लावणार, असा काकडे यांनी विचारला. पंकजा मुंडे यांनी जातीपातीचे राजकारण केल्याने त्यांचा पराभव झाला. स्वतःचा पराभव दुसऱ्याच्या माथी मारण्याचा हा प्रकार आहे. पक्षावर दबाब टाकून स्वतःच्या पदरात काही तरी मिळवण्याचा पंकजा यांची नेहमीची सवय आहे, असाही टोला यांनी लगावला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.