सगळे मंत्री मिळून मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष दूर करू - संजय बनसोडे

सगळे मंत्री मिळून मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष दूर करू - संजय बनसोडे

औरंगाबाद : राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही नेत्यांचा मराठवाड्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक आहे. मराठवाड्याने या नेत्यांना ताकद दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तारातदेखील मराठवाड्याला चांगले प्रतिनिधित्व मिळाले आहे. त्यामुळे भविष्यात मराठवाड्यातील आम्ही सगळे मंत्री मिळून या भागातील विकासाचा अनुशेष दूर करण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली. 

राज्यमंत्री झाल्यानंतर बनसोडे यांनी कॉफी विथ सकाळ कार्यक्रमात बोलतांना आपली भूमिका स्पष्ट केली. आपल्याकडे असलेल्या सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण, पाणीपुरवठा, रोजगार हमी व इतर खात्यामार्फत आपण मराठवाडा व राज्याच्या इतर भागांचा विकास करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे संजय बनसोड यांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री होऊ असे आपल्याला स्वप्नात देखील वाटले नव्हते. पण शरद पवारांसारख्या नेत्यामुळे हे शक्‍य झाले. मंत्रिमंडळावर नजर टाकली तर सर्व जाती, धर्माला त्यांनी प्रतिनिधित्व दिल्याचे आपल्याला दिसून येईल. पवार साहेंबानी टाकलेला विश्‍वास सार्थ ठरवून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आपण यापुढील काळात काम करणार आहोत असे ते म्हणाले 

मराठवाड्यातून धनंजय मुंडे, राजेश टोपे, अशोक चव्हाण, अमित देशमुख, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली आहे. आम्ही सगळे मिळून मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करू आणि येथील प्रश्‍न सोडवू. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मोठे रस्ते, पूल ग्रामीण भागातून केल्यास त्या त्या गावातील विकासाला चालना मिळेल. रस्त्यांबरोबरच ग्रामीण भागात भेडसावणारा पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरुपी सोडवण्यावर आपला भर असणार आहे. त्यामुळे रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांना निधी देऊन त्या पुर्ण करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. 

उजनीचे पाणी लातूरला आणणार... 
मी ज्या उदगीर मतदार संघातून निवडून आलो आहे त्या उदगीर आणि लातूरच्या पाण्याचा प्रश्‍न भीषण आहे. उदगीर हे तेलंगणा, आंध्र आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमेवरील गांव आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये जाणारे अतिरिक्त पाणी उदगीरला कसे मिळेल? यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. येत्या सहा महिन्यात यासाठी योजना तयार करण्याचा मानस आहे. त्याच प्रमाणे उजनीचे पाणी लातूरला आणून येथील लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरुपी सोडवण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर असल्याचे संजय बनसोडे यांनी सांगितले. उदगीर जिल्हा निर्मितीची देखील मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. या संदर्भात आपली मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यांशी चर्चा झाली आहे. जेव्हा छोट्या जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव येईल तेव्हा उदगीरचा प्राधान्याने विचार करू असे आश्‍वासन त्यांनी आपल्याला दिल्याचे संजय बनसोड यांनी यावेळी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com