सांगली : भाजपमध्ये मेगाभरती बंद ; निष्ठावंताना अच्छे दिन येणार ? 

मटका बुकी, दारूची अवैध गुत्ते चालवणारे लोक भाजपला प्रिय वाटू लागले होते. मतांची बेरीज जमवण्यासाठी जो येईल त्याला पक्षात प्रवेश दिला जात होता. त्याचा फटका या निवडणुकीत बसला आहे. लोकांना या गोष्टी रुचलेल्या नाहीत. त्यामुळे आता पक्षात प्रवेश देताना चाळण लावली जाईल, असे भाजपमधील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे .
sanjay_patil_.
sanjay_patil_.

सांगली :   भाजपचे लोकसभा निवडणुकीत घटलेले मताधिक्‍य, विधानसभा निवडणुकीत निम्म्यावर आलेल्या जागा, हक्काच्या सांगलीत काठावर आलेले मताधिक्‍य आणि मिरजेसारख्या ठिकाणी धोक्‍याची वाजलेली घंटा या बाबी पक्षाने गांभीर्याने घेतल्या आहेत.

लाट आणि हवेवर आता चालणार नाही, पक्षाची पुन्हा मजबूत बांधणी गरजेची असल्याचा स्वच्छ संदेश यानिमित्ताने पक्षाकडे पोहोचला आहे.

त्यामुळे नव्या जुन्यांचा समन्वय ठेवून पक्षाची फेरबांधणी केली जाणार आहे. राज्यात सत्ता स्थापनेचा संघर्ष संपल्यानंतर राज्य पातळीवर आणि त्यानंतर जिल्हा पातळीवर हे बदल अटळ असतील.


मटका बुकी, दारूची अवैध गुत्ते चालवणारे लोक भाजपला प्रिय वाटू लागले होते. मतांची बेरीज जमवण्यासाठी जो येईल त्याला पक्षात प्रवेश दिला जात होता. त्याचा फटका या निवडणुकीत बसला आहे. लोकांना या गोष्टी रुचलेल्या नाहीत. त्यामुळे आता पक्षात प्रवेश देताना चाळण लावली जाईल, असे भाजपमधील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे . 

सन 2014 उजाडण्याआधी भाजपची जिल्ह्यातील स्थिती फारशी चांगली नव्हती. अर्थात, जिल्ह्यात तीन आमदार होते, मात्र बांधणी नव्हती. मिरज दंगल, मोदींची लाट या हवेवर येथे भाजपला यश मिळत होते. 2014 नंतर खासदार संजयकाका पाटील यांनी भाजप प्रवेश केला आणि ते खासदार झाले. तेथून भाजपमध्ये भरती सुरू झाली. एकामागे एक निवडणुकांत विजयाचा धडाका लागला. 

एक खासदार, चार आमदार, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकांमध्ये पक्षाचा झेंडा फडकला. नेत्यांसोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी गावात आपली सत्ता राखली आणि ती भाजपची म्हणून मोजली गेली. त्यामुळे पक्ष बलाढ्य असल्याचे चित्र निर्माण झाले, मात्र सन 2019 च्या निवडणुकांनी ही सूज असल्याचे चित्र समोर आणले. 

खासदार संजयकाकांचे मताधिक्‍य अडीच लाखांवरून दीड लाखावर आले. लढत तिरंगी झाली असली तरी भाजपने घटलेले मताधिक्‍य गांभीर्याने घेतले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा दणका बसला आहे.

शिराळा आणि जत या दोन जागांवरील पराभव जिव्हारी लागला आहे. या दोन मतदार संघांत पक्षाला शंभर टक्के पुनर्बांधणी करावी लागणार आहे. जतमध्ये भाजपची शकले झाली आहेत. अनेकांनी पक्षाविरुद्ध बंड केले. त्यांचे काय करायचे, याचा निर्णय बाकी आहे.


सांगली भाजपला हक्काची होती, मात्र येथे साडेसात हजारांवर मताधिक्‍य अडले. त्यामुळे शहरी मतदारांना गृहीत धरण्याची चूक भाजप पुन्हा करणार नाही. येथे अजून संघटनात्मक पातळीवर मजबूत बांधणी गरजेची आहे. मिरजेत मंत्री सुरेश खाडे यांना लाख मताधिक्‍याची अपेक्षा होती. ती 30 हजारांवर आली. जनतेने त्यांना भानावर आणले आहे. या स्थितीत जिल्ह्यात नेटवर्क बांधण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. 


जिल्हा परिषदेत आता पदाधिकारी निवडी होतील. त्यात सत्ता राखताना भाजपची कसरत अटळ आहे. सहा महिन्यांत जिल्हा बॅंकेची आणि त्यानंतर बाजार समितीची निवडणूक लागेल. या दोन्ही संस्थांत भाजपला शिरकाव करायचा आहे. त्यामुळे केवळ नेत्यांची भरती न करता मजबूत कार्यकर्त्यांचे नेटवर्क बांधण्याला भाजप प्राधान्य देईल, असे सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com