नाशिक : आगामी 2019 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेत येणार नाही, याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (आरएसएस) खात्री पटली आहे. त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना "बळीचा बकरा' करण्याची तयारी सुरू आहे, असा दावा भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केला.
नाशिक दौऱ्यावर असलेल्या अॅड. आंबेडकर यांनी भारिप-बहुजन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या वेळी पत्रकारांशी ते बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भय्यूजी जोशी यांनी नुकतीच 'सत्तेत असणाऱ्यांना तेच सर्वेसर्वा असल्याचे वाटते. सध्या राजा कोण आहे, हे सर्वांनाच माहिती असले, तरी राजेशाही राहिलेली नाही', असे म्हणत पंतप्रधानांचे नाव न घेता टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना ऍड. आंबेडकर बोलत होते. ते म्हणाले, "भैय्यूजींचे वक्तव्य वाचल्यानंतर मला हिटलरची आठवण झाली. हिटलरच्या सहकाऱ्यांनी हिटलरवर अविश्वास दाखविला होता. त्यामुळे आता संघालाही भाजप पुन्हा सत्तेवर येणार नसल्याची जाणीव झाली आहे."
सरकारचे व्यापाऱ्यांना अभय
नोटबंदी, सर्जिकल स्ट्राइक, हे आपण सांगितले नाही, हे दाखविण्याची आरएसएसची भूमिका असावी. राज्यात शेतकरी अस्वस्थ आहे. सरकारचे व्यापाऱ्यांना अभय आहे. काँग्रेस जातीचे सरकार होते तसे हे दलालांचे सरकार आहे. राज्यातील अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. मात्र, हे गाजरच ठरेल. मंत्रिमंडळात कुणाला स्थान मिळेल असे मला वाटत नाही,"
राज्यातील अस्वस्थतेचा काँग्रेसला लाभ घेता येत नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. 'मी-टू' मुळे महिला बोलायला लागल्या हे चांगले झाले. मात्र, यामध्ये कोणाची नाहक बदनामी होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे असेही आंबेडकर एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.