महसूल राज्यमंत्री सत्तारांनी हा प्रश्न विचारला...पण उत्तर कोणालाच देता आले नाही...

....
abdul sattar
abdul sattar

अमरावती ः जबाबदारी पार पाडण्यात अकार्यक्षम अधिकाऱ्यांना साईड पोस्टिंग का दिली जाऊ नये, असे सांगत पीकविमा कंपन्या ढेकूणासमान शेतकऱ्यांचे रक्त शोषत असल्याने त्यांना वठणीवर आणण्याचे काम केले पाहिजे, असे महसूल राज्यमंत्री अब्दुल नबी सत्तार म्हणाले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल अधिकाऱ्यांची आढावा बैठक महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतली. त्याप्रसंगी ते बोलत होते. महसुली योजनांची मला माहिती नाही, तुम्हीच काय ते सांगा, असे म्हणत त्यांनी अनेकदा बारीक मुद्यांवर बोट ठेवत अधिकाऱ्यांना विचारणा केली.

ई-फेरफारवर वारसदारांची संपूर्ण नावे नोंदविलीच पाहिजे, त्याशिवाय संबंधितांना सरकारी योजनांचा पूर्णतः लाभ मिळणार नाही. महसुली प्रकरणांच्या प्रलंबित संख्येवरून महसूल राज्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यावर अधिकारी निरुत्तर होताच अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर राज्यमंत्र्यांनी प्रश्‍नचिन्ह लावले.

सेतूसुविधा केंद्रामध्ये जनतेची अडवणूक, पिळवणूक होता कामा नये, सर्वसामान्यांना मनस्ताप होणार नाही, याची काळजी अधिकाऱ्यांनी घ्यावी. कारभारात पारदर्शकता, सरकारची तसेच यंत्रणेची बदनामी होणार नाही आणि अडचणीत वाढ होणार नाही, या कार्यपद्धतीने काम करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.

पीकविमा, पंतप्रधान सन्मान निधी तसेच कर्जमाफीचा आढावा घेताना त्यांनी खासगी पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचे ढेकूणासारखे रक्त शोषण्याचे काम करीत हजारो कोटी रुपये कमावलेत. एक-दोन वर्षांच्या अपवादात्मक परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांसाठी त्या कंपन्यांचे रक्त कमी करण्याचे काम केले पाहिजे, असाही सल्ला महसूल राज्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिला. अनेक विषयांवर समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्याबाबतची माहिती मंत्रालयात पाठविण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आल्यात.

महसूल वसुली, गौणखनिज, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी, कर्जमाफी, महसुली प्रकरणे, शेतकरी आत्महत्या, नैसर्गिक आपत्ती, संजय गांधी निराधार योजना, भाडेपट्टा इत्यादी विषयांचा यावेळी आढावा घेण्यात आला. या बैठकीत महसूल राज्यमंत्र्यांनी महसूल उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर आणि चिखलदऱ्याच्या तहसीलदार श्रीमती माने यांना कित्येकदा ताई म्हणून संबोधले.

विमा कंपनी कोणती?
जिल्ह्यात पिकविम्यासाठी कोणती कंपनी आहे, अशी विचारणा महसूल राज्यमंत्र्यांनी केली. मात्र बैठकीतील एकाही अधिकाऱ्यांना ती माहिती नव्हती. काहींनी वेगवेगळी आणि तीसुद्धा चुकीची नावे सांगितली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com