बच्चू कडूंविरुद्ध लढण्यास तयार - डॉ. राजेंद्र गवई

अमरावती जिल्यातील अचलपूर मतदार संघात आमदार बच्चू कडू बलाढ्य आहेत. मी स्वतः त्यांच्या विरोधात लढण्यास तयार आहे. तरीही कॉंग्रेस आम्हाला ती जागा सोडायला तयार नाही. अचलपूर आणि दर्यापूर आम्हाला मिळणार नसतील तर कॉंग्रेससोबत चर्चेलाच जाणार नाही, अशी रोखठोक भूमिका रिपाइं (ग) चे राष्ट्रीय नेते डॉ. राजेंद्र गवई यांनी आज रविभवन येथे पत्रकार परिषदेत मांडली.
डॉ. राजेंद्र गवई आणि आमदार बच्चू कडू
डॉ. राजेंद्र गवई आणि आमदार बच्चू कडू

नागपूर : अमरावती जिल्यातील अचलपूर मतदार संघात आमदार बच्चू कडू बलाढ्य आहेत. मी स्वतः त्यांच्या विरोधात लढण्यास तयार आहे. तरीही कॉंग्रेस आम्हाला ती जागा सोडायला तयार नाही. अचलपूर आणि दर्यापूर आम्हाला मिळणार नसतील तर कॉंग्रेससोबत चर्चेलाच जाणार नाही, अशी रोखठोक भूमिका रिपाइं (ग) चे राष्ट्रीय नेते डॉ. राजेंद्र गवई यांनी आज रविभवन येथे पत्रकार परिषदेत मांडली. 

निवडणुकीमध्ये आव्हानात्मक जागा नेत्यांनीच लढल्या पाहीजे. सोप्या जागांवर नेत्यांनी लढून कार्यकर्त्यांना कठीण मतदारसंघात पाठविणे योग्य नाही. किमान मी तसा विचार करत नाही. कारण मी कार्यकर्त्यांचा घास खात नाही, असेही त्यांनी सांगितले. 

लोकसभेत आघाडी न करता स्वतंत्र निवडणूक लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला कॉंग्रेसने भाजपची "बी' म्हटले होते. आम्ही स्वतंत्र लढलो तर आम्हालापणे ते "बी' म्हणतील. कॉंग्रेस निवडून न येणाऱ्या जागाही मित्र पक्षासाठी सोडण्यास तयार नसल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर व अचलपूर या दोन जागा न दिल्यास आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा त्यांनी दिला. 

डॉ. गवई यांनी सांगितले की, गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही भाजप-शिवसेना युतीला हरवण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला साथ दिली. अमरावती येथून आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांना निवडून आणले. विधानसभेसाठी आम्हाला जास्त जागा सोडाव्या लागतील, असे तेव्हा आम्ही त्यांना सांगितले होते. त्यांनीही त्यावेळी सहमती दर्शविली होती. आता विधानसभेसाठी आम्ही कॉंग्रेसकडे आठ जागांची मागणी केली आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर व अचलपूर या दोन मतदार संघाचाही समावेश आहे. या दोन्ही मतदारसंघातून कॉंग्रेस गेल्या अनेक वर्षांत निवडून आलेली नाही. येथे रिपाइं स्वतंत्र लढल्यास दुसऱ्या क्रमांकावर राहते. तेव्हा या दोन्ही जागा रिपाइंसाठी सोडाव्या, अशी आग्रही मागणी आम्ही केली आहे. परंतु कॉंग्रेस यावर काहीही बोलण्यास तयार नाही. दर्यापूरच्या जागेवर मला लढण्यास सांगत आहे. मात्र मी अचलपूरवरून लढणार आहे. आघाडीने या दोन जागा न दिल्यास रिपाइं स्वतंत्रपणे 50 जागा लढवेल, असे त्यांनी सांगितले. 

पत्रपरिषदेला एन.आर. सुटे, प्रकाश कुंभे, अर्जुन खंडारे, राहुल जारोंडे, प्रा. बुद्धराज मून, एकनाथ ताकसांडे, गोपाल डोंगरे, क्षितीज गायकवाड, आशिष मेश्राम, निळू भगत उपस्थित होते. 

आंबेडकरांशी चर्चा करणार 
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याशी संपर्क झाला आहे. पुन्हा त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे. आघाडीतून बाहेर पडून वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याचाही आपला विचार असल्याचेही डॉ. गवई म्हणाले. 

जगतापांची आडकाठी 
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी खासदार नाना पटोले यांच्यासह ईतर बड्या नेत्यांशी चर्चा झाली. जागा सोडण्यास त्यांची तयारी आहे. मात्र आमदार विरेंद्र जगताप आडकाठी टाकत आहे. त्यामुळेच आघाडीत अडथळा निर्माण होत आहे. अचलपूर विधानसभा मतदार संघातून आ. बच्चू कडू हे सातत्याने निवडून येतात. कॉंग्रेस ही जागा सातत्याने हरत आहे. कडू यांच्यासारख्या बलाढ्य उमेदवाराविरुद्ध मी स्वत: लढण्याचे आव्हान स्वीकारले आहे. मी कडुंच्या विरोधात लढणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com