माजी खासदार दिलीप गांधी यांना रिझर्व्ह बॅंकेचा दणका; मुलगा, पत्नीचे खाते रडारवर

माजी खासदार दिलीप गांधी यांना रिझर्व्ह बॅंकेचा दणका;  मुलगा, पत्नीचे खाते रडारवर

नगर : नगर अर्बन मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या संचालक मंडळाचे अधिकार आज गोठविण्यात आले. रिझर्व्ह बॅंकेचे अधिकारी सुभाषचंद्र मिश्रा यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. आज सकाळी त्यांनी बॅंकेचा ताबा घेतला. नगर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात व विशेषत: बॅंकिंग क्षेत्रात या कारवाईने अस्वस्थता पसरली आहे. बॅंकेचा ताबा घेतल्यानंतर प्रशासक मिश्रा यांनी तातडीने संचालक मंडळास, अधिकार काढून घेतल्याची नोटीस बजावली. ही नोटीस सर्व संचालकांना पोच करण्यात आली.

पथकासह बॅंकेत सकाळी दहाच्या सुमारास पोचलेल्या मिश्रा यांनी प्रथम बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन गांधी यांना त्याबाबत कल्पना दिली, तसेच तातडीने बॅंकेच्या अध्यक्षांच्या दालनात बसून, रिझर्व्ह बॅंकेने नगर अर्बन बॅंकेचा ताबा घेतल्याचे जाहीर केले. अध्यक्षांच्या दालनात बसूनच मिश्रा यांनी प्रथम वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पदाधिकाऱ्यांना बॅंकेतर्फे देण्यात आलेली वाहने ताब्यात घेण्याचे आदेश दिले. पथकाने सकाळपासूनच बॅंकेतील कागदपत्रांची कसून तपासणी सुरू केली. ही तपासणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

गेल्या काही वर्षांपासून नगर अर्बन बॅंकेचा एनपीए सातत्याने वाढत आहे. मागील वर्षी तो 30.53 टक्‍क्‍यांवर पोचला. त्या वेळी झालेल्या लेखापरीक्षणाच्या अहवालात बॅंकेला एनपीए कमी करण्याची सक्त ताकीद रिझर्व्ह बॅंकेने दिली होती. तथापि, या वर्षी तो पुन्हा वाढल्याचे अहवालात स्पष्ट झाले. या वर्षीचा एनपीए जवळपास 40 टक्‍क्‍यांवर पोचल्याचे लेखापरीक्षण अहवालात म्हटले आहे. हाच एनपीए बॅंकेच्या अहवालानुसार 33 टक्‍क्‍यांपर्यंत असल्याचा दावा केला गेल्याचे समजते. कर्जवितरणातील या प्रमुख मुद्द्यासह अन्य काही गंभीर मुद्द्यांवरही रिझर्व्ह बॅंकेतर्फे आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. त्याचे समाधानकारक खुलासे होत नसल्याने आज बॅंकेच्या संचालक मंडळाचे अधिकारच गोठविण्याचा निर्णय घेण्यात आला. 

दरम्यान, बॅंकेचा ताबा प्रशासकांनी घेतल्याने रात्री उशिरापर्यंत अधिकाऱ्यांची बैठक सुरू होती. प्रशासक मिश्रा यांनी सर्वच अधिकाऱ्यांना तंबी दिली. एनपीए कमी होईपर्यंत कोणत्याही प्रकारचे कर्जवितरण आता नगर अर्बन बॅंकेतून होणार नसल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. या मुद्द्यावर बॅंकेचे माजी संचालक राजेंद्रकुमार गांधी यांनी सातत्याने रिझर्व्ह बॅंकेकडे तक्रारी केल्या होत्या. 

गांधींच्या खात्यातील रकमांचा खुलासा अमान्य
रिझर्व्ह बॅंकेच्या 27 ऑगस्ट 2018 रोजी झालेल्या तपासणी अहवालात बॅंकेला अनेक मुद्द्यांवर नोटीस बजावली होती. बॅंकेला म्हणणे मांडण्याची संधी दिली होती. मात्र, आक्षेप असलेल्या मुद्द्यांवर बॅंकेतर्फे समाधानकारक खुलासा झाला नसल्याचे समजते. बॅंक प्रशासनालाही हा खुलासा करता आला नाही. बॅंकेचे अध्यक्ष दिलीप गांधी यांचा मुलगा सुवेंद्र व पत्नी सरोज यांच्या बॅंक खात्यांत काही ठरावीक कर्जदारांकडून रकमा जमा करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यात बॅंकेतर्फे खुलासा करण्यात आला. तथापि, तो पथकास मान्य नसल्याचे समोर आले आहे. 

नगर अर्बन बॅंकेचा कारभार अत्यंत सुस्थितीत आहे. केवळ एनपीए वाढल्याने भारतीय रिझर्व्ह बॅंकेतर्फे तात्पुरत्या स्वरूपात सुभाषचंद्र मिश्रा यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे. मात्र, त्याचा बॅंकेच्या व्यवहारांवर काहीच परिणाम होणार नाही. बॅंकेचे दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे सुरूच राहतील. एनपीए कमी होईपर्यंतच रिझर्व्ह बॅंकेने संचालक मंडळाचे अधिकार काढले आहेत, असे
दिलीप गांधी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com