सांगली : भाजपचे खासदार नारायण राणे हे 13 दिवसांत सरकार कोसळेल असे म्हणाले होते. परंतु येत्या 15 दिवसांतही ते पडू शकते, अशी टोलेबाजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.
सांगलीतील भावे नाट्य मंदिरात बहुजन समता पार्टीतर्फे सत्यशोधक अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त महाअधिवेशन झाले. त्यामध्ये त्यांनी नेहमीच्या शैलीत भाषण केले. भाषणात त्यांनी खासदार नारायण राणे यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत राज्यातील महाविकास आघाडी सरकारबाबत भाकीत केले. ते म्हणाले,"नारायण राणे यांनी 13 दिवसांत सरकार पडेल असे सांगितले होते. सरकार कधीही पडू शकते. किती दिवस सरकार टिकेल माहीत नाही. राज्यात महायुतीची सत्ता येईल असे आम्हाला वाटले होते. मात्र राजकारणात जे वाटते ते होत नाही. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाच वर्षे सरकार टिकेल असे वाटते, परंतु तसे घडणार नाही. सरकार कधी पडेल असे सांगता येत नाही.''
सांगलीतील कार्यक्रमाबरोबर श्री. आठवले मिरजेत धम्म परिषदेसाठी उपस्थित राहिले. तेथे पत्रकारांशी बोलतानाही त्यांनी महाविकास आघाडी सरकारबाबत खळबळजनक वक्तव्य केले. ते म्हणाले,"राज्यातील सरकार फार काळ टिकणार नाही. सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. तिन्ही पक्षांमध्ये वैचारिक वाद आहेत. त्यांच्यात संघर्ष होत आहे. 13 दिवसांत नव्हे तर 15 दिवसांत सरकार कोसळेल. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेने पुन्हा एकत्र यावे. आपण मिळून सरकार बनवू शकतो. राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर महिलांच्या अत्याचारामध्ये वाढ झाली आहे. सरकारची कर्जमुक्तीची योजना फसवी निघाली आहे.''
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.