नियमित कर्ज भरणाऱ्यांनो निश्चिंत रहा, प्रोत्साहनपर 50 हजार देणारच : जयंत पाटील

शेतकरी कर्जमाफी संदर्भात सरकार गंभीर आहे. कोरोनामुळे अडचणी आल्या, मात्र कोरोनाचा काळ नक्की संपेल.त्यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत अर्थसंकल्पिय अधिवेशनात घोषणा केली आहे. पुढच्या दोन महिन्यात आर्थिक स्थिती विचारात घेऊन शेतकऱ्यासंदर्भात केलेल्या घोषणाबाबत अंमलबजावणी करण्यासाठी आमची वाटचाल राहिल.
Minister Jayant Patil
Minister Jayant Patil

सातारा : शासनाने दोन लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याचे जाहिर केले. त्याची अंमलबजावणी सुरु असून त्याचप्रमाणे नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम देण्याचे शासनाने जाहिर केले आहे. कोरोनाचा काळ संपताच पुढील दोन महिन्यात जाहिर केलेल्या घोषणेप्रमाणे त्याची निश्‍चित अंमलबजावणी होईल, अशी जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. 

जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे आज मुंबईला जाताना साताऱ्यातील हॉटेल प्रिती येथे थोडावेळ थांबले होते. यावेळी त्यांची आमदार मकरंद पाटील, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील माने, प्रभाकर घार्गे, बॅंकेचे संचालक नितीन पाटील यांनी भेट घेतली.

कर्जमुक्ती अभियानाबाबत जिल्हा बँकेच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. तसेच या सर्वांनी कर्जमुक्ती अभियानाच्या अंमलबजावणीविषयी विविध प्रश्‍नांची उत्तरे जाणून घेतली. कर्जमुक्ती योजनेत दोन लाखांच्या आतील पात्र कर्जदारांचा समावेश आहे. तथापी मुळ कर्ज रक्कम दोन लाखांपेक्षा कमी असणारी व व्याजामुळे एकत्रित रक्कम दोन लाखांपेक्षा जादा होणारी तसेच मुळ कर्ज दोन लाखांपेक्षा जास्त असणाऱ्या थकीत शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.

त्यामुळे दोन लाखांवरील थकबाकीदार सभासदांना किमान दोन लाखांपर्यंतचा लाभ मिळणे आवश्‍यक आहे.  शासनाने सध्या स्विकारलेल्या धोरणाप्रमाणे दोन लाखापर्यंतच्या शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे बॅंकांना शासन येणे दाखवून नवीन कर्जवाटप करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याच पध्दतीने दोन लाखांवरील थकबाकीदार शेतकऱ्यांनाही दोन लाखापर्यंतची रक्कम शासन येणे दाखवून उर्वरीत रक्कम भरुन नवीन कर्जवाटप करण्याचा शासन निर्णय होणे आवश्‍यक आहे, अशी अपेक्षा आमदार मकरंद पाटील, सुनील माने, प्रभाकर घार्गे, नितीन पाटील व संचालकांनी केली.

तसेच जिल्हा बॅंकेने कॅश क्रेडीट पीक कर्ज योजना नियमित व्याजदराने सुरु केली आहे. या कर्ज योजनेचा समावेश महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत करुन घेण्याची मागणीही त्यांनी केली.  याबाबत मंत्री जयंत पाटील म्हणाले, शेतकरी कर्जमाफी संदर्भात सरकार गंभीर आहे. कोरोनामुळे अडचणी आल्या, मात्र कोरोनाचा काळ नक्की संपेल.

त्यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत अर्थसंकल्पिय अधिवेशनात घोषणा केली आहे. पुढच्या दोन महिन्यात आर्थिक स्थिती विचारात घेऊन शेतकऱ्यासंदर्भात केलेल्या घोषणाबाबत अंमलबजावणी करण्यासाठी आमची वाटचाल राहिल. त्यामुळे शेतकऱ्यांनी निश्‍चिंत राहावे. यावेळी जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, शशिकांत पिसाळ, राजकुमार पाटील, नारायण जाधव, भरत देशमुख, जितेंद्र कदम, धीरज नलावडे व पदाधिकारी उपस्थित होते. 
.............. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com