थकबाकीदारांना महावितरण देणार शाॅक; कधीही होऊ शकतो वीजपुरवठा खंडित

राज्यात एकूण 63 हजार 740 कोटी रुपयांची थकबाकी असल्याने वीजबिल वसुलीची मोहिम महावितरण राबविणार आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महावितरणविरूध्द रान पेटण्याची शक्यता आहे.
Mahavitaran can cut power connection at any time
Mahavitaran can cut power connection at any time

मुंबई : थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने राज्यातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. राज्यात एकूण  63 हजार 740 कोटी रुपयांची थकबाकी असल्याने वीजबिल वसुलीची मोहिम महावितरण राबविणार आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महावितरणविरूध्द रान पेटण्याची शक्यता आहे. 

लाॅकडाऊन काळात वाढीव वीजबिलांमुळे ग्राहक हैराण झाले होते. याविरोधात भाजप व मनसेने राज्यभर आंदोलने करत वाढीव वीजबिल न भरण्याचे आवाहन ग्राहकांना केले होते. महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2020 अखेर राज्यात एकूण  63 हजार 740 कोटी रुपयांची थकबाकी असून यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. आता जर ग्राहकांनी वीज बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडित करण्याशिवाय महावितरणसमोर कोणताच पर्याय उरलेला नाही.

डिसेंबर अखेर राज्यातील कृषिपंप ग्राहकांकडे 45 हजार 498 कोटी रुपयांची थकबाकी आहे तर वाणिज्यिक,  घरगुती व औदयोगिक ग्राहकांकडे 8 हजार 485 कोटी रुपये व उच्चदाब ग्राहकांकडे 2 हजार 435 कोटी रुपयांची थकबाकी आहे.

राज्यात मार्च 2020 मध्ये कोविड 19 मूळे लॉकडाऊनच्या काळात थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित न करण्याचा निर्णय महावितरणने घेतला होता. राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा डिसेंबर अखेरपर्यत खंडित न करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. 

ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणला वीज खरेदीसाठी पुरवठादारांना रोजच पैसे द्यावे लागतात. प्रचंड वाढलेल्या थकबाकीमुळे आता यापुढे थकबाकी वसूल करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना जानेवारीपासून मोहिमा राबविण्याचे निर्देश महावितरणने दिले असून थकबाकी वसुलीत कसूर करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाईचे संकेतही दिले आहे. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांनी आपल्या वीज बिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

हप्त्यामध्ये वीजबिल भरण्याचे सवलत

थकबाकीदार ग्राहकांना वीज बिल सुलभ हप्त्यामध्ये भरण्याची सवलत महावितरणने दिलेली आहे. सोबतच थकबाकीवर विलंब आकार न लावण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. तसेच ग्राहकांच्या वीज बिलासंबंधी तक्रारी असल्यास त्या तात्काळ सोडविण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत.

कर्मचाऱ्यांचे वेतन देणेही अशक्य

लॉकडाऊनच्या काळात खाजगी  वीज वितरण कंपन्यांनी थकबाकी वसूल करण्यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाची रीतसर परवानगी घेऊन सप्टेंबर 2020 मध्ये थकबाकी वसुलीची मोहीम मुंबई व मुंबई उपनगरात चालू केली व थकबाकीपोटी अनेक ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत केला.

मात्र राज्याचे उर्जामंत्री डॉ राऊत यांनी डिसेंबर अखेरपर्यंत थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे महावितरणला निर्देश दिले होते. परंतु आता थकबाकीचा डोंगर वाढल्याने दैनंदिन कामकाज चालविणे महावितरणला शक्य होत नसल्याने, बँकांची व इतर देणी व कर्मचाऱ्यांचा पगार देणेही अशक्य झाले आहे.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com