भाजपचा डाव उधळण्यासाठी 63 आमदारांना महामंडळांची लॉटरी 

विरोधी पक्षाची सरकारे पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून विविध डावपेच खेळले जात आहे. मध्य प्रदेशातील कॉंग्रेसचे राज्य खालसा केल्यानंतर त्यांनी राजस्थानकडे मोर्चा वळविला; परंतु तेथे त्यांना पटकी खावी लागली. आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडे भाजपने डोळे वटारल्याचे सांगण्यात येत आहे.
Mahamandal's lottery for 63 MLAs to thwart BJP's innings
Mahamandal's lottery for 63 MLAs to thwart BJP's innings

जळगाव : विरोधी पक्षाची सरकारे पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून विविध डावपेच खेळले जात आहे. मध्य प्रदेशातील कॉंग्रेसचे राज्य खालसा केल्यानंतर त्यांनी राजस्थानकडे मोर्चा वळविला; परंतु तेथे त्यांना पटकी खावी लागली. आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडे भाजपने डोळे वटारल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आघाडी सरकारनेही कंबर कसली असून राज्यातील महामंडळे, प्राधिकरण अध्यक्षपदाच्या नियुक्‍त्या तातडीने करण्यात येणार आहेत. त्यावर महाविकास आघाडीचे सदस्य असलेल्या आमदारांना संधी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. यात प्रमुख पक्ष असलेले शिवसेनेचे 56, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 54 आणि कॉंग्रेस पक्षाचे 44 आमदार आहेत. या शिवाय आघाडी सरकारला पाठिंबा देणारे काही लहान पक्षांचे तसेच अपक्ष आमदारही आहेत. राज्यात आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून "ते लवकरच पडणार' अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेषत: भाजपचे नेते अधूनमधून "हे सरकार जास्त दिवस चालणार नाही' अशी विधाने करीत असतात. 

कर्नाटकनंतर भाजपने मध्य प्रदेशातील कॉंग्रेसचे आमदार फोडून त्या ठिकाणी भाजपचे सरकार स्थापन केले. त्यानंतर हाच प्रयोग राजस्थानमध्ये कॉंग्रेस सरकार पाडण्यासाठी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही. पण, त्या ठिकाणी अद्यापही राजकीय सुंदोपसुंदी सुरूच आहे. 

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजप प्रयत्न करीत असल्याचे सत्ताधारी पक्षाकडूनच सातत्याने आरोप करण्यात येत आहे. राजस्थाननंतर महाराष्ट्रात सरकारमधील पक्षाचे आमदार फोडण्याचा प्रयत्न भाजप करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

मात्र, सत्ताधारी गटाच्या मंत्र्यांनीही भाजपच्या या प्रयत्नाला सुरूंग लावण्यासाठी भाजपतील आमदारच सत्ताधारी गटाकडे येण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे जाहीर केले होते. राज्य मंत्री बच्चू कडू यांनी गेल्याच आठवड्यात भाजपचे चाळीस आमदार सत्ताधारी महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचे जाहीर करून राज्यात खळबळ उडवून दिली होती. 

सत्ताधारी महाविकास आघाडीचे आमदार फोडून भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापनेचा प्रयत्न करणार, याची जाण महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही आहे. त्यामुळे नाराज आमदार भाजपच्या गळाला लागू नये, यासाठी महाविकास आघाडीतील तीनही मोठ्या पक्षाचे नेते काळजी घेत आहे. 

आमदारांची नाराजी काढण्यासाठी लवकरच आता राज्यातील महामंडळावर त्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. महामंडळे, मंडळे तसेच प्राधिकरण अध्यक्षपदास कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आहे. त्यामुळे या नियुक्‍त्या घोषित केल्यानंतर शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी व पाठींबा देणाऱ्या लहान पक्ष आणि अपक्षांसह एकूण साधारण 63 आमदारांच्या नियुक्‍त्या होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सत्ताधारी गटातील बहुतांश आमदारांची नाराजी कमी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

राज्यातील महामंडळे, मंडळे व प्राधिकरणावर पक्षाचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या नियुक्‍त्या करण्यात येत होत्या. मात्र आता राज्यात तीन पक्षासह काही लहान घटक पक्षाच्या पाठिंब्याचे सरकार असल्यामुळे अनेक आमदारांना सत्तेत संधी हवी आहे. त्यामुळे आता महामंडळावर सत्ताधारी महाविकास आघाडीतील आमदारांच्या नेमणुका होणार आहेत. 

याबाबतचा निर्णय तीनही पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत झाला असून या नियुक्‍त्या लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षातर्फे राज्यात सत्तांतर घडविण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत. त्याला "खो' देण्याचा सत्ताधारी महाविकास आघाडीचा प्रयत्न असल्याचेही सांगण्यात येत आहे. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com