किरीट सोमय्या म्हणतात, ईडीची जप्ती आलेला जरंडेश्वर कारखाना अजित पवारांचा!

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचं ईडीनं म्हटलं आहे.
Kirit Somaiya welcomed ED attachment of properties of Jarandeshwar Sahkari Sugar Mill
Kirit Somaiya welcomed ED attachment of properties of Jarandeshwar Sahkari Sugar Mill

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ED) जप्ती आणलेला जरंडेशवर सरकारी साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचाच असल्याचा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याभोवती ईडीचा फास आवळत असताना आता सोमय्या यांनी अजित पवारांनाही लक्ष्य केलं आहे. (Kirit Somaiya welcomed ED attachment of properties of Jarandeshwar Sahkari Sugar Mill) 
 
ईडीने आज सायंकाळी ट्विट करून कारखान्याच्या जप्तीची माहिती दिली आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील चिमणगांवमध्ये जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेशी संबंधित मनी लाँर्डींग प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचं ईडीनं म्हटलं आहे. राज्य सहकारी बँकेत सुमारे 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता ईडीनेही कारखान्यावर जप्ती आणत मोठ्या कारवाईचे संकेत दिले आहेत. 

ही कारवाई झाल्यानंतर किरीट सोमय्या यांनी ईडीने केलेल्या कारवाईचे स्वागत केले. तसेच ईडीने आज अजित पवार यांचा बेनामी जरंडेश्वर कारखाना ताब्यात घेतल्याची वक्तव्य असलेला व्हिडीओ प्रसारीत केला आहे. सोमय्या यांच्या या दाव्यामुळं राज्याच्या राजकारणासह सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. राज्याच्या राजकारणात सध्या ईडीच्या कारवाईमुळं वादळ उठलं आहे. 

अनिल देशमुख यांच्या पीएंना अटक करण्यात आली असून ईडीकडून 100 कोटी वसुलीच्या प्रकरणांचा कसून तपास केला जात आहे. तर भाजपनं अजित पवार व अनिल परब यांचीही चौकशी करण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडं केली आहे. त्यानंतर काही दिवसांतच जरंडेश्वर कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. हा कारखाना अजित पवारांचा असल्याचा दावा सोमय्या यांनी केल्याने या कारवाईवरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी राज्य बँकेतील घोटाळ्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. राज्यातील अनेक कारखान्यांनी बँकेकडून कर्ज घेत ते बुडवल्याने बँकही बुडाली. काही साखर कारखान्यांची कमी भावात विक्री झाल्याचेही नंतर स्पष्ट झालं. या प्रकरणावरून राज्यात मोठे राजकारणही झाले.

जरंडेश्वर कारखान्यावर आधी माजी मंत्री शालिनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ होते. नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व असलेल्या सोमेश्वर कारखान्याने हा कारखाना चालवायला घेतल्यानंतरही त्याची स्थिती सुधारली नाही. त्यामुळे राज्य बँकेनं हा कारखाना विक्रीला काढला होता. 
 
राज्य बँकेतील कथित घोटाळ्याच्या चौकशी अहवालामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ, भाजपचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांची नावे होती. हे सर्वजण त्यावेळी बँकेवर संचालक होते. घोटाळ्याचे प्रकऱण समोर आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने 2011 मध्ये संचालक मंडळ बरखास्त केले. या प्रकरणात संचालक मंडळावर फसवणुकीसह अन्य गंभीर खुनाचे गुन्हेही दाखल करण्यात आला होते. पण पाच महिन्यांपूर्वीच पवारांसह इतरांनाही क्लीन चीट देण्यात आली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com