औरंगाबाद ः शहराचे नांव संभाजीनगर करा, अशी मागणी करत २६ जानेवारीचा अल्टीमेटम देणाऱ्या मनसेनेने आता `संभाजीनगर आम्हीच करू`, अशा पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल करायला सुरूवात केली आहे. कारण मनसेची डेडलाईन संपून चार दिवस उलटून गेले तरी आता पुढे काय? याचे उत्तर मनसेकडून दिले जात नव्हते. मात्र शिवसेनेच्या नेत्यांनी आता संभाजीनगर म्हणणे बंद करावे, संभाजीनगर आम्हीच करू, असे जाहीर आव्हानच मनसेने शिवसेनेला दिले आहे.
गेल्या काही महिन्यापासून औरंगाबादचे संभाजीनगर करण्याचा मुद्दा राज्यभरात गाजताे आहे. यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये काही बिघडते का? याकडे देखील अनेकांचे लक्ष लागले होते. काॅंग्रेने शहराची नावे बदलून सामान्यांचा विकास होतो का? आमच्या काॅमन मिनिम प्रोग्रामचा हा भाग नाही, आमचा संभाजीगरला कडाडून विरोध आहे, अशी भूमिका घेतली होती. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी तर कुणाला काय म्हणायचे ते म्हणा, मी त्या विषयाकडे फारसे गांभीर्यांने पाहत नाही, म्हणत या वादापासून राष्ट्रवादीला वेगळेच ठेवले.
परंतु आगामी महापालिकेच्या निवडणुका पाहता संभाजीनगरचा मुद्दा तापवत ठेवायचा अशीच काहीशी रणणीती शिवसेना, मनसे, भाजप या पक्षांची ठरलेली दिसते. भाजपने संभाजीगरला आमचा पाठिंबा आहे, पण तो निवडणुकीचा मुद्दा होऊ नये, अशी भू्मिका घेत शिवसेनेची कोंडी केली, तर मनसेने या मुद्यावरून शिवसेनेला लाचार म्हणत इतके दिवस संभाजीनगर का केले नाही?असे म्हणत हा मुद्या हायजॅक करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यातूनच शहरात २६ जानेवारी पर्यंत संभाजीनगर करा, अन्यथा, असा इशारा देणारे बॅनर, विभागीय आयुक्तांना अल्टीमेटमची आठवण देणारे पत्र देण्याचा कार्यक्रम मनसेने राबवला.
मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी संभाजीनगरच्या मुद्यावरून शिवसेनेवर जोरदार हल्ला देखील चढवला. संभाजीनगर म्हणणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांना या शहाराचे अधिकृत नाव संभाजीनगर का करता आले नाही? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. २६ जानेवारीची डेडलाईन संपल्यानंतर पुढे काय? असा प्रश्न सातत्याने मनसेला विचारला जात होता. यावर नुकतीच दाशरथे यांनी भूमिका स्पष्ट केली.
शिवसेनेने व त्यांच्या नेत्यांनी आता संभाजीनगर म्हणणे बंद करावेे, त्याची लाचारी दिसून आली आहे. आम्ही दिलेल्या डेडलाईनमध्ये शिवसेनेला संभाजीगर करता आले नाही, आता मनसेच ते करून दाखवणार. यापुढे काय होईल हे तुम्हाला दिसलेच असा सूचक इशारा देखील त्यांनी दिला. त्यामुळे येणाऱ्या काळात मनसे संभाजीनगरच्या मुद्यावरून अधिक आक्रमक होत खळखट्याकची भूमिका घेणार असे दिसते.
Edited By : Jagdish Pansare

