औरंगाबाद ः नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण सलग तिसऱ्यांदा विजयी झाले. यावेळी त्यांना मिळालेले मताधिक्य हे पदवीधरमध्ये मिळालेले केवळ राज्यातीलच नाही तर देशातील सर्वाधिक असल्याचा दावा केला जातोय. अर्थात या मागे सरकारमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचा मोठा वाटा असल्याचे बोलले जाते. पण राष्ट्रवादीचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी मात्र वेगळाच खुलासा केला आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांना आम्ही प्रचाराला येऊ नका म्हणून सांगत होतो, पण ते येतच होते. आम्हाला वरून आदेश आहेत, असे सांगून ते प्रचाराला आले. त्यामुळे त्यांना सांभाळण्यातच आमचा बराच वेळ गेला, असेही काळे यांनी सांगितले.
आमदार सतीश चव्हाण यांनी हॅट्रीक साधल्याबद्दल शनिवारी त्यांचा गौरव संभारंभ ठेवण्यात आला होता. राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी. आपल्या भाषणात त्यांनी अनेक मागण्या, खुलासे आणि गौप्यस्फोट केले. मला आणि सतीश चव्हाण यांना आता तरी मंत्री करा, ही त्यांनी मागणी तर सध्या चांगलीच चर्चेत आहे. या शिवाय सतीश चव्हाण यांच्या प्रचारा दरम्यानच्या काही गोष्टींचा उलगडा देखील काळे यांनी आपल्या भाषणातून केला.
सतीश चव्हाण हे विक्रमी मतांनी तिसऱ्यांदा निवडूण आले, असा उल्लेख करतांना काळे म्हणाले, पदवीधरचे मतदान हे सुशिक्षित मतदारांचे मतदान असते,आणि हा मतदार सातत्याने राष्ट्रवादीच्या पाठीशी आहे. यावेळी तर आपली ताकद शिवसेना, काॅंग्रेसमुळे वाढली होती. मराठवाड्यात सतीश चव्हाण यांचा इतका प्रचार झाला, की शिवसेनेच्या मंत्र्यांना आम्ही प्रचाराला येऊ नका, असे म्हणत होतो, पण ते ऐकतच नव्हते. वरून आदेश असल्याचे सांगत त्यांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये सभा घेतल्या. राज्यमंत्री अब्दुल सत्तार तर यात आघाडीवर होते.
पण पदवीधरचा मतदार हा काही जाहीर सभा, मेळावे, बैठकांना येणार नसतो. त्यामळे शिवसेनेच्या मंत्र्यांची सभा किंवा बैठक घ्यायची म्हटलं की निदान त्यांच्या भाषणाला दहा लोक तरी यायला पाहिजे यासाठी आम्हाला बरीच कसरत करावी लागली, यातच आमचा अधिक वेळ गेला. पण शिवसेना आणि काॅंग्रेसने सतीश चव्हाण यांचे प्रामाणिकपणे काम केले, अशी सारवासारव देखील काळे यांनी केली.
विधान परिषदेच्या निवडणुकीत अमरावती शिक्षक मतदारसंघ व धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेची एक जागा सोडली तर सगळ्याच ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. तीन पक्षांची ताकद एकत्रित आल्याने हा चमत्कार महाराष्ट्रात घडल्याचे सगळेच नेते मान्य करतात. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांना जोमाने कामाला लावले होते. निवडणूक निकालानंतर त्याचे परिणाम देखील दिसून आले. असे असतांना विक्रम काळेंकडून अशा प्रकारचे वक्तव्य, तेही चव्हाण यांच्या गौरव संमारंभात होणे, याचा सर्वांनाच आश्चर्यांचा धक्का बसला.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.