जालना : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकार नोकर भरती जाहीर करतंय. पन्नास हजारांपेक्षा जास्त पदांसाठी नोकर भरती केली जाणार आहे. या नोकऱ्या आमच्या हक्काच्या आहेत..त्यामुळे १ एप्रिल पर्यंत नोकर भरती आणि एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकला, अन्यथा दिल्लीतील शेतकरी आंदोलनासारखे उग्र आंदोलन उभे करू, असा इशारा शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिला.
जालन्यातील मराठा एल्गार मेळाव्यात विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती असतांना राज्यात सुरू असलेली नोकरभरती, आरक्षणा संदर्भात सरकारकडून हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप करत मेटे यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली.
विनायक मेटे म्हणाले, मराठा आरक्षणाचा निर्णय झालेला नसतांना मोठ्या प्रमाणात सरकारमधील नोकर भरती सुरू करत आहे, ज्यामुळे मराठा समाजाच्या हक्कांच्या नोकऱ्यावर गदा येणार आहे. त्यामुळे जोपर्यंत आरक्षणाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत म्हणजे १ एप्रिलपर्यंत एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या पाहिजे. सरकारने या संदर्भात जर निर्णय घेतला नाही, तर दिल्लीत जसे शेतकऱ्यांचे उग्र आंदोलन सुरू आहे, तसे आंदोलन आम्ही उभे करू. या आंदोलनाता मी सर्वात पुढे असेन, मग मला गोळ्या घालायच्या असल्या तर घाला, पण मी मागे हटणार नाही.
राज्य सरकार मराठा आरक्षण देण्यात यशस्वी होईल असं वाटत नाही, मात्र यासाठी मराठा समाजाने एकत्र येण्याची गरज आहे. सात पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती राजेश टोपे यांचे वडील अंकुशराव टोपे यांनी कमावून ठेवली. मग आरोग्य विभागातील नोकर भरती करून टोपे यांना काय साध्य करायचं आहे, असा घणाघात देखील मेटे यांनी केला. अशोक चव्हाण हे केंद्राने मराठा आरक्षण प्रश्नी लक्ष घालण्याची मागणी करतायेत, चव्हाण यांच्या मनात मराठा समाजाबद्दल पाप असून तुम्ही गोट्या खेळण्यासाठी खुर्चीवर बसले आहात का? असा संतप्त सवाल करत मेटें यांनी अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ ,नितीन राऊत हे ओबीसी- मराठा समाजात भांडण लावत असल्याचा आरोप करत मराठा आरक्षणाची सुनावणी होईपर्यंत नोकर भरती होणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी असे आवाहन देखील मेटे यांनी उपस्थितांना केले. मुख्यमंत्री आणि शरद पवारांनी आरक्षण आणि नोकर भरती संदर्भात रणनीती ठरवावी, अन्यथा समाज काय करेल हे मी सांगू शकणार नाही, असा इशारा मेटे यांनी दिला. येणाऱ्या १३ तारखेला नांदेड येथे अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यासाठी एल्गार मेळावा घेणार असल्याची घोषणाही मेटेंनी केली.
Edited By : Jagdish Pansare

