निलंगा : मुंबई शहरातील एका मतदारसंघातून निवडणूक लढलेल्या शिवसेनेच्या बड्या नेत्यासाठी लातूर ग्रामीण मतदरासंघात काॅंग्रेस सोबत फिक्सींग करण्यात आले होते. त्या बदल्यात शिवसेनेने लातूर ग्रामीणची जागा स्वतःकडे घेत काॅंग्रेस विरोधात कुमकूवत उमेदवार देत काॅंग्रेसला मदत केली, त्याबदल्यात काॅंग्रेसने शिवसेनेला मुंबईत. त्यामुळे लातूरात काॅंग्रेसचा एकतर्फी विजय झाला, पण दुसऱ्या क्रमाकांवर तिथे शिवसेना नव्हती तर नोटा होते, असा आरोप भाजपचे माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला.
निलंगा तालुक्यातील विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात निलंगेकरांनी हा खळबळजनक दावा केला. विशेष म्हणजे त्यांनी लातूर ग्रामीणचा उल्लेख केला असला तरी या मतदार संघाचे विद्यमान काॅंग्रेस आमदार धीरज देशमुख यांचे नाव घेणे टाळले. तर मुंबईतील शिवसेनेचा बडा नेता म्हणजे युवासेनेचे अध्यक्ष व राज्याचे पर्यटण व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे त्यांच्या इशारा असल्याची जोरदार चर्चा या निमित्ताने राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
आमदार सभाजी पाटील निलंगकेर यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेना व काॅंग्रेसमध्ये कसे फिक्सींग झाले होते, यांची रंजक कहाणी आज पत्रकरांना सांगितली. विशेष म्हणजे निवडणुकीच्या वर्षभराने त्यांनी हा खुलासा किंवा आरोप का केल? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ काॅंग्रेसने दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे धाकटे चिरंजीव धीरज देशमुख यांच्यासाठी घेतला होता. जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात धीरज यांनी केली होती.
त्यानंतर त्यांना विधानसभेत पाठवण्याची तयारी काॅंग्रेसने सुरू केली होती. हा विजय त्यांना सोपा जावा यासाठी फिक्सींग करण्यात आले होते, असा दावा आणि आरोप निलंगेकरांनी केला. थेट नामोल्लेख टाळत त्यांनी आपला इशारा कुणाकडे आहे हे मात्र दाखवून दिले. मुबंईतील वरळी मतदारसंघाचा उल्लेख करत त्यांनी आपण युवासेनेचे अध्यक्ष आणि विद्यमान मंत्री आदित्य ठाकरे यांच्या बाबतच बोलत असल्याचे देखील अधोरेखित केले.
आदित्य ठाकरे हे ठाकरे घराण्यातील निवडणूक लढवणारे पहिले व्यक्ती असल्यामुळे शिवसेनेसाठी ही मोठी प्रतिष्ठेची लढाई होती. त्यामुळे वरळी सारखा सुरक्षित मतदारसंघ देखील निवडण्यात आला होता. परंतु कुठल्याही प्रकारची जोखीम नको म्हणून शिवसेनेला या मतदारसंघात काॅंग्रेसची देखील मदत लागणार होती. ही मदत मिळावी यासाठी शिवसेनेला लातूर ग्रामीण मध्ये काॅंग्रेसला मदत करण्याची गळ घालण्यात आली होती.
शिवसेनेने इथे कुमकूवत उमेदवार देऊन धीरज देशमुख यांचा विधानसभेतील प्रवेश सुकर करावा, असे डील शिवसेना आणि काॅंग्रेसमध्ये झाले होते. पुढे घडलेही तसेच शिवसेनेने लातूर ग्रामीणमध्ये कुमकूवत उमेदवार दिला. त्यामुळे काॅंग्रेसचा तिथे विजय झाला आणि दुसऱ्या क्रमाकांवर नोटाला मते मिळाली होती, असा आरोपही निलंगेकरांनी केला. या फिक्सींगमुळे शिवसेनेचा देखील विजय झाला, असेही त्यांनी सांगितले.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.