अजितदादांचा डाव अन्‌ कार्यकर्ता चक्रव्यूहात 

भविष्यात शिवेंद्रसिंहराजे यांनी पक्षात प्रवेश केला, तर कदाचित त्याचा पक्षाला फायदा होईलही; पण नाहीच केला, तर दादांच्या या रणनीतीचा फटकाही तेवढाच मोठा असेल... आणि मग उद्याच्या जिल्हा परिषद- पंचायत समित्यांच्या निवडणुकांत आम्ही एवढ्या जागा मिळवल्या, हे सांगताना भाजप नेते दिसले, तर त्यात नवल वाटायला नको. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा खरं दुःख हे आहे. एक तरी नेता त्यावर भाष्य करणार का?
Ajit Pawar's innings and activists in a maze
Ajit Pawar's innings and activists in a maze

या आठवड्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्यासाठी दोन 'गूड न्यूज' दिल्या. रखडलेल्या कास तलावाच्या कामासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून निधीचा मार्ग मोकळा केला. तसेच साताऱ्याच्या बहुचर्चित मेडिकल कॉलेजसाठी एकसष्ठ कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती दिली. सातारकरांचे दोन महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावले, ही शिवेंद्रसिंहराजे यांची कामगिरी कौतुकास्पद म्हणावी लागेल.

सत्ता असो वा नसो मात्र,जनतेचे प्रश्‍न सोडविण्याची बांधिलकी आपल्यात काय असायला हवी, अशी त्यांच्यातील 'तळमळ' यामागे असावी. कारण विकास कामांसाठी भाजपमध्ये जातोय, असं जाहीरपणे सांगत ते भाजपवासी झाले आणि आता महाविकास आघाडीच्या सरकारकडून ते विकास कामांसाठी पैसे आणत आहेत, हा त्यांच्या 'कौशल्याचा' भाग असावा. असो. 

जिल्ह्याचे दोन महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागत असल्याचे समाधान देणारे हे दोन निर्णय मात्र महाविकास आघाडीच्या विशेषतः राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची घुसमट वाढवणारे ठरले आहेत.'हे चाललंय काय? ' असा भाबडा प्रश्न हे सर्वसामान्य कार्यकर्ते विचारू लागले आहेत. कास तलाव असो किंवा मेडिकल कॉलेज असो, पैसा पुरवत आहे, महाविकास आघाडीचे सरकार आणि त्याची घोषणा करत आहेत भाजपचे आमदार. जिल्ह्यातले महाविकास आघाडीचे किंवा राष्ट्रवादीचे नेते या विकासकामाविषयी चकार शब्दही काढत नाहीत. राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते त्याबाबत गप्प का? असा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सतावत आहे. 

महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या कामांचे श्रेय 'मी करून आणले' या आवेशात भाजपचे आमदार लाटणार असतील, तर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत तसेच आत्ताच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीतही 'आम्ही याचसाठी केला होता का अट्टाहास' असा सवाल हे कार्यकर्ते विचारत आहेत आणि त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर महाविकास आघाडीचा एकही नेता देत नाही. महाविकास आघाडीची फळ अशा प्रकारे दुसऱ्याच्या दारात पडताहेत आणि त्यावर आपला कुठलाही नेता साधं भाष्यही करत नाही, हे या कार्यकर्त्यांचं दुःख आहे.

कास तलावाचा विषय थोडा बाजूला ठेवू. कारण निदान शिवेंद्रसिंहराजेंनी त्यावर सातत्याने पाठपुरावा तरी केला आहे. पण मेडिकल कॉलेजच्या प्रश्नावर तरी आघाडीच्या नेत्यांनी हक्काने बोलायला हवं. मुळात मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाली पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना. तत्कालीन पालकमंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी मेडिकल कॉलेजसाठी केलेला पाठपुरावाही सर्वश्रुत आहे. पण पुढे विजय शिवतारे यांच्या पालकमंत्रिपदाच्या कार्यकाळात जागेच्या घोळात हा प्रश्न रखडत ठेवला गेला. हेही जनतेला माहीत आहे.

आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने त्याला हिरवा कंदील दाखवला; पण त्याची घोषणा करून टाकली भाजप आमदारांनी. कार्यकर्त्यांचं म्हणणं एवढंच, की निदान एवढ्या मोठ्या कामाची घोषणा या बैठकीला उपस्थित असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या पालकमंत्र्यांनी किंवा निदान राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी तरी करायला हवी होती. पण त्यांची चुपी का? का असेही काही आहे, की एवढा मोठा निर्णय घेताना उपमुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातल्या इतर नेत्यांना विश्वासातच घेतले नाही?

दादांना यामधून नेमकं काय साधायचे आहे? शिवेंद्रसिंहराजेंसारख्या पक्ष सोडलेल्या बड्या नेत्यांना ताकद देऊन 'गटबांधणी' करायची आहे का 'पक्षबांधणी'?  अशा अनेक प्रश्‍नांचे जंजाळ कार्यकर्त्यांना सतावत आहे. दादांच्या मनात काहीही असो; पण सद्यस्थितीत येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये त्याचा फार मोठा फटका राष्ट्रवादीला बसू शकतो. नेमक्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या वेडी भाजप आमदाराच्या माध्यमातून या दोन बातम्या आल्यामुळे या निवडणुकांत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता ढीला पडणार नाही का? 

राष्ट्रवादी म्हणून ग्रामपंचायत, नगरपालिका निवडणुकांत एरवी इर्ष्येने उभा राहणारा कार्यकर्ता वरचे हे चित्र बघून त्याच्यात किती आत्मविश्वास राहिलेला असेल? उद्या काहीही होणार असेल, तर आपण आता विरोध का घ्यायचा, असा विचार त्याच्या मनात येणार नाही का? भविष्यात शिवेंद्रसिंहराजे यांनी पक्षात प्रवेश केला, तर कदाचित त्याचा पक्षाला फायदा होईलही; पण नाहीच केला, तर दादांच्या या रणनीतीचा फटकाही तेवढाच मोठा असेल... आणि मग उद्याच्या जिल्हा परिषद- पंचायत समित्यांच्या निवडणुकांत आम्ही एवढ्या जागा मिळवल्या, हे सांगताना भाजप नेते दिसले, तर त्यात नवल वाटायला नको. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा खरं दुःख हे आहे. एक तरी नेता त्यावर भाष्य करणार का? 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com