काय होता वाद की, भाजयुमोच्या शहर उपाध्यक्षाचा चिरला गळा 

राज डोरले यांनी अल्पावधितच महाल, भूतेश्‍वरनगरासह शहरात आपले काम सुरू ठेवले होते. गणेशोत्सव आणि दुर्गोत्सवादरम्यान राज डोरलेचा जलवा राहत होता. लॉकडाऊन काळात तर राशन वाटप, फूड पॅकेट वाटप आणि धान्य किट वाटपही केले होते.
murder
murder

नागपूर : शहरातील एका गॅंगने भारतीय जनता युवा मोर्च्याच्या शहर उपाध्यक्षाचा गळा चिरून खून केला. ही थरारक घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास भूतेश्‍वरनगरात घडली. राज विजयराज डोरले (वय 28, रा. भूतेश्‍वरनगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या हत्याकांडात दोघांना अटक करण्यात आली. राजचे राजकीय वजन वाढत असल्यामुळे वर्चस्वाच्या वादातून हा "गेम' केल्याची चर्चा शहरात आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज डोरले हे भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष होते. त्याचे पक्षात वजनही चांगले होते. त्यामुळे त्यांचे वर्चस्व अनेकांनी खटकत होते. गेल्या काही दिवसांपूर्वी राजचा मित्र सारंग बावनकुळे याच्याशी आरोपी मुकेश निळकंठ नारनवरे (वय 30, रा. भूतेश्‍वरनगर) याचा वाद झाला होता. त्यावेळी मुकेशने सारंगला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे राज डोरले यांनी सारंगच्या पाठीशी उभे राहून मुकेशला दम भरला होता. त्यावेळी मुकेशने माघार घेत राजला पाहून घेण्याची धमकी दिली होती. तेव्हापासून मुकेश आणि राज डोरलेमध्ये धुसफूस सुरू होती. 

काल सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास राज डोरले हे दुचाकीने आपल्या घरी जात होते. भूतेश्‍वरनगर चौकात घात लाऊन बसलेल्या मुकेश नारनवरे, अंकित विजयराज चतुरकर (वय 28, भूतेश्‍वरनगर) आणि त्यांच्या पाच ते सहा साथीदारांनी राज डोरले यांना घेरले. त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकले. त्यानंतर आरोपींच्या टोळीने राज डोरले यांच्यावर हल्ला चढवला. मुकेशने राजचा गळाच चिरला. राज यांना रक्‍ताच्या थारोळ्यात लोळवून आरोपींनी पळ काढला. घटना उघडकीस येताच कोतवाली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. आरोपीविरूद्ध गुन्हे दाखल करून दोन आरोपींना अटक केली. 

"त्यांना' राजची लोकप्रियता खटकली 
राज डोरले यांनी अल्पावधितच महाल, भूतेश्‍वरनगरासह शहरात आपले काम सुरू ठेवले होते. गणेशोत्सव आणि दुर्गोत्सवादरम्यान राज डोरलेचा जलवा राहत होता. लॉकडाऊन काळात तर राशन वाटप, फूड पॅकेट वाटप आणि धान्य किट वाटपही केले होते. दिवसेंदिवस राज लोकप्रिय होत होते. भविष्यात राज डोरले मोठा नेता होऊ शकतो, म्हणून काही कार्यकर्ते त्याचे पाय ओढत होते. डोरले मोठा होऊ नये, म्हणून त्याचा काटा काढण्यात आल्याची चर्चा शहरात आहे. 

आरोपींची संख्या वाढण्याची शक्‍यता 
राज डोरले हा मनमिळावू स्वभावाचा होता. मात्र, त्याने सारंग बावनकुळे या मित्रासोबत वाद घालणाऱ्या मुकेश नारनवरे सोबत पंगा घेतला होता. त्याने पाहून घेण्याची धमकी दिली होती. तेव्हापासून मुकेश हा स्वतःचा गेम होऊ नये, म्हणून अंकित चतुरकर, विक्‍की, शुभम, सागर आणि कार्तिक या युवकांची टोळी बनवून राहत होता. राज डोरलेचा गेम करण्याच्या पूर्ण तयारीत तो होता, अशीही चर्चा आहे. 

पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे हत्याकांड 
राज डोरले आणि सारंग बावनकुळे यांच्यासोबत मुकेश नितनवरेची चांगली हाणामारी झाली होती. त्यावेळी राज आणि मुकेशने एकमेकांचा गेम करण्याची धमकी दिली होती. हे प्रकरण कोतवाली पोलिस ठाण्यात पोचले होते. पोलिसांनी तिघांविरूद्ध केवळ एनसी (अदखलपात्र) गुन्ह्याची नोंद करीत फाईल बंद केली होती. त्यामुळे कोतवाली पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे राज डोरले हत्याकांड घडल्याचेही बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com