महापालिकेत पाणी करवाढ पेटलीच, मुंढेंविरोधात १०८ नगरसेवक करणार आंदोलन 

शहरात जर पाणी शुल्क दरवाढ होत असेल तर त्याला पूर्णपणे जबाबदार पालकमंत्री डॉ. नितीन राऊत सुद्धा राहतील, असा घणाघातही सत्तापक्ष नेते जाधव यांनी केला. आयुक्त उलटसुलट निर्णय घेतात, पालकमंत्री मात्र त्यात हस्तक्षेप करीत नाही. काँग्रेसचे नगरसेवकही मूग गिळून गप्प आहेत, त्यामुळे मुंढे यांना पुढे करून काँग्रेस पक्षाने रचलेले हे षडयंत्र तर नाही ना, अशी शंकाजाधव यांनी व्यक्त केली.
Tukaram Mundhe
Tukaram Mundhe

नागपूर : महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पाणी करवाढ जाहीर केल्यानंतर या विषयावरून सत्ताधारी आणि आयुक्त पुन्हा एकदा आमने-सामने येतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. आयुक्तांची कार्यपद्धती पाहता हा निर्णय ते मागे घेणार नाहीत आणि महापौर व सत्ताधारी नगरसेवक आपली मागणी रेटून धरतील, असे वाटतच होते आणि झालेही तसेच. आज सत्ताधाऱ्यांनी मुंढेंच्या विरोधात रणशिंग फुंकले. पाणी करवाढीचा निर्णय तीन दिवसांत मागे न घेतल्यास १३ आॅगस्टपासून भाजपचे सर्व १०८ नगरसेवक आयुक्तांच्या कक्षासमोर आंदोलन करतील, असा इशारा सत्तापक्षनेते संदीप जाधव यांनी आज दिला. 

पाणी करामध्ये वाढ करण्यात येऊ नये, यासाठी महापौर संदीप जोशी यांनीही आयुक्तांना सूचना केली. मात्र आयुक्तांनी त्याचीही दखल घेतली नाही. प्रशासनाने स्थायी समितीकडे पाठविलेला प्रस्ताव स्थायी समितीने परत पाठविला. मात्र त्यावरही आयुक्तांनी उलट उत्तर दिले. हा प्रस्ताव केवळ नोंदीसाठी पाठविला होता. तो मंजूर करावा अथवा नाही याचा स्थायी समितीला अधिकार नसल्याचे आयुक्तांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले होते. सध्या कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. जे नोकरीत आहे त्यांना पूर्ण पगार मिळत नाही. 

वीज कंपनीने तिपटीने वाढवून बिल पाठविले. त्यामुळे मध्यमवर्गीय आणि गरिबांचे कंबरडे मोडले आहे. दरवर्षी ५ टक्के दरवाढीचा निर्णय झाला असला तरी या काळात ती करू नये, अशी मागणी सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी केली. तीन दिवसांत याबाबत अंतिम निर्णय न झाल्यास भाजपचे १०८ नगरसेवक १३ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता आयुक्तांच्या कक्षासमोर आंदोलन करतील, असा इशारा देत त्यांनी हा आंदोलनाचा पहिला टप्पा असेल, अशी पुस्तीही जोडली. आंदोलनानंतरही निर्णय होत नसेल तर जनआंदोलन पुकारावे लागेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी सध्याचे पालकमंत्री, आयुक्त आणि प्रशासनाची असेल, असा इशाराही त्यांनी दिला. 

पालकमंत्री डॉ. राऊत यांच्यावरही घणाघात 
शहरात जर पाणी शुल्क दरवाढ होत असेल तर त्याला पूर्णपणे जबाबदार पालकमंत्री डॉ. नितीन राऊत सुद्धा राहतील, असा घणाघातही सत्तापक्ष नेते जाधव यांनी केला. आयुक्त उलटसुलट निर्णय घेतात, पालकमंत्री मात्र त्यात हस्तक्षेप करीत नाही. काँग्रेसचे नगरसेवकही मूग गिळून गप्प आहेत, त्यामुळे मुंढे यांना पुढे करून काँग्रेस पक्षाने रचलेले हे षडयंत्र तर नाही ना, अशी शंकाही जाधव यांनी व्यक्त केली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com