रेती तस्करांनी जाळली खमारी-बेलगाव फाट्यावरील पोलिस चौकी ?

पहाटेच्या वेळी घटना घडली असून सकाळी उघडकीस आली. चौकीत कुणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. यात रेती तस्करांचे कृत्य असल्याची चर्चा गावकरी करीत आहे.
Bhandara Fire Sand
Bhandara Fire Sand

भंडारा : जिल्ह्यातून होत असलेली कोट्यवधी रुपयांची रेती चोरी रोखण्यासाठी खमारी ते बेलगाव फाट्यावर पोलिस चौकी उभारण्यात आली आहे. येथे कर्मचारीही तैनात असतात. आज पहाटे काही अज्ञात लोकांनी ही पोलिस चौकीच जाळून टाकली. रेती तस्करांनीच चौकी जाळली असावी, असा कयास लावण्यात येत आहे. हे काम तस्करांचेच असावे, असे गावकरी सांगत आहेत. 

रात्री चौकीत पोलिस कर्मचारी नव्हते, त्यामुळे जीव हानी झाली नसली तरी चौकीची मात्र जळून राख झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील रेती चोरीचा मुद्दा सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांत चर्चेचा झाला आहे. परवाच भंडारा-गोंदिया क्षेत्राचे विधान परिषदेचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी हा मुद्दा विधानपरिषदेत आक्रमकपणे मांडला. विधानसभेच्या दोन आमदारांनी या मुद्यावर पायऱ्यांवर आंदोलनही केले. अशा परिस्थितीत ही घटना घडणे म्हणजे रेती तस्कर अधिक मुजोर झालेत का, असा प्रश्‍न गावकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

पहाटेच्या वेळी घटना घडली असून सकाळी उघडकीस आली. चौकीत कुणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. यात रेती तस्करांचे कृत्य असल्याची चर्चा गावकरी करीत आहे. ही पोलिस चौकी कारधा पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने कारधा पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त केला जात आहे. तर वाळू तस्करांपासून गावकरी त्रस्त झाले होते. त्यांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर ही चौकी लावल्याचे नागरिकांनी सांगितले. चौकीत आग लागली तेव्हा नियुक्त असलेले पोलिस कर्मचारी उपस्थित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेबाबत मात्र पोलिस बोलण्यास नकार देत आहे. त्यामुळे घटना होणार होती, हे पोलिसांना माहिती होते आणि पोलिसांचे तस्करांना संरक्षण आहे का, असे प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. 

पोलिस कर्मचारी दिवसा चौकीत असतात, ते आम्हाला येता-जाताना दिसतात. पण ते रात्री राहत नाहीत. रेती तस्कर दररोज दिवसा आणि रात्री नदीपात्रातून शेकडो ट्रक रेती चोरी करतात. त्यांना पोलिसांचे संरक्षण आहे की काय, असे आम्हाला वाटू लागले आहे. या प्रकाराला वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही पाठबळ असल्याचा आमचा आरोप आहे. रोज १०० ते १५० ट्रॅक्टर या रोडवर चालतात. तरीही कारवाई केली जात नाही. वनविभागाच्या परिसरातून ही वाहतूक होते. त्यामुळे वनविभागही यामध्ये सामील आहे की काय, अशी शंका आहे.  
ज्ञानदेव सुदाम टेभूर्णे, रहीवासी, बेलगाव मांडवी. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com