महसूल विभाग आणि खाकीवरही वाळूतस्कर पडले भारी...

महसूल व पोलिस प्रशासनाकडून वाळूच्या वाहनावर जप्तीसह दंडात्मक कारवाई केली जाते. दररोज कारवाई केली जाते. तरीदेखील अवैधरित्या होणारी वाळू तस्करीला आळा घालता आला नाही. वाळूतस्करांनी पोसलेले गुंड कारवाई टाळण्यासाठी थेट अधिकारी वर्गाच्या हालचालींवर लक्ष ठेवून असतात.
Walu Taskar
Walu Taskar

यवतमाळ : कमी कालावधीत कोट्यवधींची माया गोळा करण्याचा व्यवसाय म्हणून वाळूघाटांकडे बघितले जाते. या व्यवसायात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा झालेला शिरकाव प्रशासनासह सामान्य नागरिकांची चिंता वाढविणारा ठरला आहे. सुरुवातीला अर्थपूर्ण संबंधातून केलेली डोळेझाक आता अधिकारी व कर्मचाऱ्यांच्याच जिवावर उठली आहे. राजकीय, 'मसल-मनी पॉवर'च्या जोरावर वाळूतस्कर महसूल, खाकीवरही भारी ठरत आहेत. परवाच्या घटनेने यावर शिक्कामोर्तबच केले आहे.

उमरखेडचे नायब तहसीलदार वैभव पवार, तलाठी गजानन सुरोशे यांच्यावर शनिवारी रात्री वाळूतस्करांनी चाकूहल्ला केला. त्यात स्वतः नायब तहसीलदारांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेमुळे महसूल व पोलिस प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे. स्वतः जिल्हाधिकारी एम देवेन्द्र सिंह यांनी या घटनेची दखल घेऊन हल्लेखोरांना तातडीने जेरबंद करण्याचे आदेश दिले आहे. मात्र, 24 तासांतही आरोपी पोलिसांच्या हाती लागले नव्हते. त्यानंतर सहा जणांना अटक करण्यात आली. मात्र मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे. यातच सर्वकाही दडले असल्याचे जनतेचे म्हणणे आहे. जिल्ह्यात असलेल्या शेकडो वाळूघाटांची लिलावप्रक्रिया अद्याप पूर्ण होऊ न शकल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी अवैधरित्या वाळूउपसा करून आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. 

जेसीबी, ट्रेझर बोटचा वापर करून नदीपात्राला पार पोखरून काढले आहे. नदीपात्रात निर्माण झालेले खोल खोल खड्डे वाळूमाफियांची कहानीच सांगून जातात. वाळूघाटांतून शासनाला कोट्यवधींचा महसूल मिळतो. मात्र, मागील काळात लिलाव न झाल्याने या महसुलावर शासनाला पाणी फेरावे लागले आहे. कधीकाळी बांधकाम व्यावसायिकांचा वरचष्मा असलेल्या वाळू व्यवसायात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी आपला जम बसविला आहे. त्यांना राजकीय व प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांचे अभय मिळत असल्याचा लोकांचा आरोप आहे. एवढेच नव्हे तर वाळूच्या अवैध व्यवसायात अनेक राजकीय पक्षाचे पांढरपेशे नेतेसुद्धा गुंतलेले असल्याचे सांगण्यात येते. एकूणच मोठी माया या व्यवसायातून निर्माण होत आहे. 

वरिष्ठ अधिकारी म्हणूनच याकडे दुर्लक्ष करीत आहेत. एखाद्या अधिकार्‍याने कारवाईचा बडगा उगारण्याचे ठरविल्यास राजकीय वजन वापरून अधिकार्‍याला चुप बसविले जाते अथवा बळाचा वापर करून रक्त सांडविण्यापर्यंत वाळू तस्करांची हिंमत वाढली आहे. राजकीय पदाधिकार्‍यांनी वाळूतस्करीत आपली दुकानदारी थाटली आहे. शासकीय कार्यालयात त्यांची ढवळाढवळ वाढली आहे. यापूर्वीही जिल्ह्यात महसूल प्रशासनातील अधिकार्‍यांवर हल्ला होण्याच्या घटना घडल्या आहेत. उमरखेड येथील घटनेने हल्ल्याचा कळसच गाठला आहे. आगामी काळात वाळूतस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे महसूल प्रशासनाचे व जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. 

जिल्ह्यात वाढती दादागिरी
महसूल व पोलिस प्रशासनाकडून वाळूच्या वाहनावर जप्तीसह दंडात्मक कारवाई केली जाते. दररोज कारवाई केली जाते. तरीदेखील अवैधरित्या होणारी वाळू तस्करीला आळा घालता आला नाही. वाळूतस्करांनी पोसलेले गुंड कारवाई टाळण्यासाठी थेट अधिकारी वर्गाच्या हालचालींवर लक्ष ठेवून असतात. इतकेच नव्हे तर त्यांचा पाठलागही करतात. जिल्हाभरात वाळू तस्करांची वाढती दादागिरी प्रशासनाची चिंता वाढविणारी आहे.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com