खोटारड्या सरकारला धडा शिकविण्यासाठी विधानपरिषदेत पदवीधरांचा आवाज बुलंद करा : खासदार तडस

लॉकडाऊनमध्ये जनता आधीच त्रस्त असताना वीज बिल माफीचे गाजर दाखवून नंतर वारंवार निर्णय बदलून लोकांच्या परिस्थितीची थट्टा करणाऱ्या सरकार विरोधात लॉकडाऊनमध्येही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केली आहेत. संघर्ष करण्याचे संस्कार पक्षाने दिलेले आहेत. त्यामुळे जनसामान्यांच्या, पदवीधर, बेरोजगारांच्या प्रश्नांसाठी कुठल्याही स्तरावर संघर्ष करणार आहे, असेही संदीप जोशी यांनी सांगितले.
Sandeep Joshi
Sandeep Joshi

वर्धा : पदवीधर मतदारसंघ हा सुशिक्षित, जाणकार, अभ्यासू लोकांचा मतदारसंघ आहे. समाजातील समस्या, येथील नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम या मतदारसंघाचे प्रतिनिधी करत आलेले आहेत. आजपर्यंत पंडीत बच्छराज व्यास, गंगाधरराव फडणवीस ते पुढे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रा.अनिल सोले यांनी चोखपणे पदवीधरांचे प्रतिनिधीत्व केले आहे. पक्षाचा गड राहिलेला हा मतदारसंघ कायम ठेवण्याची जबाबदारी आता पक्षाने नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर सोपविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पदवीधर मतदारांनी नेहमी विदर्भाला सावत्र वागणूक देणाऱ्या या खोटारड्या ‘बिघाडी’ सरकारला जाब विचारण्यासाठी तरुणांचा, पदवीधरांचा, बेरोजगारांचा संदीप जोशी हा आवाज बुलंद करा, असे आवाहन वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी केले.

हा मतदारसंघ भाजपकडे कायम राहणार यात कुठलीही शंका नाही. राजकीय आणि प्रशासकीय बाबींचा उत्तम अभ्यास असलेले योग्य उमेदवार पक्षाने दिले आहेत. संदीप जोशी पदवीधरांचे प्रतिनिधित्व करताना विभागातील प्रत्येक प्रश्नांना न्याय देतील, हा विश्वास आहे. यासोबतच विदर्भावर होत आलेला आणि आताही महाविकास आघाडी सरकारच्या नेतृत्वात होणाऱ्या अन्यायाविरूद्धही संघर्ष करतील यात कुठलीही शंका नाही, असेही खासदार तडस म्हणाले.  

संदीप जोशी यांनी काल वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे, आष्टी, आर्वी, पुलगाव, देवळी येथे संपर्क दौरा केला. संपर्क दौऱ्यामध्ये विविध ठिकाणी खासदार रामदास तडस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सभांमध्ये आर्वी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दादाराव केचे, भाजपचे वर्धा जिल्हाध्यक्ष डॉ.शिरीष गोडे, संघटन महामंत्री अविनाशजी देव, वर्धा जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, महाराष्ट्र प्रदेश सचिव राजेश बकाने, भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुधीर दिवे, संघटन महामंत्री अविनाश देव, संदीप काळे, भाजपा युवा मोर्चा वर्धा जिल्हा अध्यक्ष वरूण पाठक, सुनील गपाट, कमल गोलधरीया, शिरीष भांगे, मुकुंद बारंगे, कमलाकर निभोरकर, आष्टी पंचायत समिती सदस्य रेखाताई मतले, सुरेश खवशी, चक्रधर डोंगरे, संजय कदम, आर्वी नगराध्यक्ष विनय देशपांडे, सभापती हणमंतराव चरडे, भाजपा पुलगाव शहर अध्यक्ष नितीन बडगे, पुलगाव नगराध्यक्ष शीतल घाटे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष वैशाली येरावार, शिक्षण परिषदेचे ज्येष्ठ सदस्य बाबाराव देशमुख, राजीव जयस्वाल, राजीव बत्रा, मंगेश झाडे, दीपक फुलकरी, सुनीता राऊत, किशोर भवाडकर, संजय गाथे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

खासदार रामदास तडस म्हणाले, विदर्भावर सातत्याने अन्यायच होत आला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारच्या मागील पाच वर्षांत विदर्भाला न्याय मिळाला होता. मात्र आता पुन्हा एकदा विदर्भ अन्यायाच्याच खाईत लोटला जात आहे. वर्धा जिल्ह्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केवळ ५८ लाख रुपये दिले. दुसरीकडे मराठवाड्यातील एकेका जिल्ह्याला २०० कोटी दिले. आमच्या विदर्भातील सोयाबीनला १०-२० रुपये भीक देणारे हे सरकार निधीसाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवत स्वतः हात वर करतेय. अशा या मग्रूर सरकारला धडा शिकविण्यासाठी पदवीधर मतदारसंघ निवडणूक ही मोठी आहे. त्याचे सोने करा, तरुण, पदवीधर, बेरोजगारांचे प्रश्न जाणणाऱ्या संदीप जोशींना पहिले पसंतीक्रम द्या, असेही आवाहन खासदार रामदास तडस यांनी केले. 

कारंजा एमआयडीसी प्रलंबित काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार : संदीप जोशी
संपर्क दौऱ्यामध्ये प्रारंभी संदीप जोशी यांनी कारंजा घाडगे येथे पदवीधरांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुधीर दिवे यांनी कारंजा तालुक्याची माहिती देत येथील समस्या सांगितल्या. तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचे सिंचन आणि बेरोजगारांना काम या दोन मोठ्या समस्या आहेत. कारंजा येथे एमआयडीसी येण्याबाबतचे काम बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहे. एमआयडीसी आल्यास येथील उद्योग वाढेल आणि जिल्ह्यातील अनेकांना रोजगार मिळेल. आपल्या विजयात जिल्ह्यातील पदवीधर मतदारांचेही मोठे योगदान असणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तरूणांसाठी, बेरोजगारांसाठी एमआयडीसी आणण्यासाठी प्रयत्न करावे, अशी विनंतीही सुधीर दिवे यांनी संदीप जोशी यांना केली. 

यावर बोलताना संदीप जोशी म्हणाले, कारंजा येथे एमआयडीसी होणे हे वर्धा जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने उत्तम बाब आहे. यामुळे येथील तरुण, बेरोजगारांना रोजगार मिळेलच शिवाय नवउद्यमींनाही मोठे व्यासपीठ मिळेल. त्यामुळे विधानपरिषदेत पदवीधरांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्यास येथील खासदार, आमदार व सर्व पदाधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून संपूर्ण ताकदीने शतप्रतिशत प्रयत्न करणार असल्याचे संदीप जोशी यांनी सांगितले. 

५८ वर्षापूर्वी अस्तित्वात आलेला नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ भारतीय जनता पक्षाकडे कायम राखण्यामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांचे बहुमुल्य योगदान आहे. पक्षाचे कार्यकर्ते हे देवदुर्लभ आहेत. प्रत्येक परिस्थितीत समाजहितासाठी उभे राहिले आहेत. कोरोनामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनमध्ये राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी वीज बिल माफ करण्याची घोषणा केली. तीन तिघाडी सरकारमधील मुख्यमंत्र्यांनी यावर आक्षेप नोंदवताच अवघ्या २४ तासात उर्जामंत्र्यांनी घोषणा बदलवित ३०० युनिटपर्यंत चे वीज बिल माफ करणार असल्याचे सांगितले. मात्र ही बाब बारामतीकरांना न रूचल्याने ऊर्जामंत्र्यांवर पुन्हा घोषणा बदलवण्याची नामुष्की आली. त्यानंतर १०० युनिट पर्यंत चे वीज बिल माफीची घोषणा ऊर्जामंत्र्यांनी केली. आता तीन दिवसापूर्वी कुठल्याही प्रकारचे वीज बिल माफ होणार नसल्याचे ऊर्जामंत्र्यांनी सांगितले. 

लॉकडाऊनमध्ये जनता आधीच त्रस्त असताना वीज बिल माफीचे गाजर दाखवून नंतर वारंवार निर्णय बदलून लोकांच्या परिस्थितीची थट्टा करणाऱ्या सरकार विरोधात लॉकडाऊनमध्येही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केली आहेत. संघर्ष करण्याचे संस्कार पक्षाने दिलेले आहेत. त्यामुळे जनसामान्यांच्या, पदवीधर, बेरोजगारांच्या प्रश्नांसाठी कुठल्याही स्तरावर संघर्ष करणार आहे, असेही संदीप जोशी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com