चंद्रपूर : जिल्ह्यात आपत्कालीन उपाययोजनांसाठी ३० एप्रिलपर्यंत नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. परंतु गेल्या वर्षभरापासून लहान व्यापारी त्रस्त होते. दोन महिन्यापूर्वी त्यांची गाडी जेमतेम रुळावर आली होती. आणखी त्यांची दुकाने बंद करणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता ‘माझा व्यवसाय माझी जबाबदारी’ हा उपक्रम राबवावा, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे.
यासाठी राज्य सरकारने वेगळ्या अटी आणि नियमावली तयार करावी. व्यापाऱ्यांना ‘माझा व्यवसाय माझी जबाबदारी’ च्या अटींवर सर्व नियमांचे पालन करीत त्यांची दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्याची लोकहितकारी मागणी खासदार धानोरकर यांनी केली आहे. छोटे व्यावसायिक वर्ग जात कापड दुकानदार, जनरल स्टोअर्स, सलून व इतर व्यावसायिकांची प्रतिष्ठाने सरसकट बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे व्यावसायिक कसेबसे कुटुंब जगवत असतात. बँकेचे हप्ते भरण्यासाठीसुद्धा यांच्याकडे दुकान बंद असल्यामुळे पैसे नाहीत.
अनेक व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना सर्वांना अवगत आहेत. त्यामुळे यात शिथिलता आणत सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत परवानगी देण्यात यावी, अशी मागणी व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. पहिल्या कोरोना लाटेत लॉकडाऊनमध्ये लहान मोठे व्यावसायिक प्रचंड डबघाईस आले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनीदेखील लॉकडाऊनचे परिणाम गंभीर होतील, याकडे लक्ष वेधले आहे. त्यासोबतच रेमडेसिव्हर इंजेक्शनचा कृत्रिम तुटवडा जाणवत असून दरांबाबत व संभाव्य काळ्या बाजाराबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देऊन छापे टाकण्याचे आदेश देण्याची मागणी देखील खासदार धानोरकर यांनी केली आहे.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.