हा भाजपचा नव्हे, देवेंद्र फडणविसांचा पराभव : अतुल लोंढे

या निवडणुकीच्या निकालांनी आणखी एक गोष्ट अधोरेखित केली ती म्हणजे, बॅलेट पेपर मतदान. महाविकास आघाडी सरकारने यापुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या सर्व निवडणुका या ईव्हीएम द्वारे न घेता बॅलेट पेपर मतदान पद्धतीचा अवलंब करून घ्याव्या.
Atul Londhe
Atul Londhe

नागपूर : विधानपरिषद निवडणुकांच्या निकालानंतर जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे नेते आणि प्रवक्त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या निकालाने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले. दरम्यान हा भाजपचा नव्हे, तर देवेंद्र फडणविसांचा पराभव असल्याचे कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले. 

श्री लोंढे म्हणाले, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांचे नेतृत्व आणि अहंकार महाराष्ट्राने नाकारला. त्यांच्या हेकेखोरपणामुळे त्यांच्याच पक्षाचे महाराष्ट्रात मोठे नुकसान झाले. महाविकास आघाडी सरकारची स्थापना आणि आता विधानपरिषद निवडणुकांचे निकाल, हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये फडणविसांनी महत्वाच्या नेत्यांना घरी बसवले. त्याचा परिणाम काय झाला, हे त्यांनी बघितले आहे. सर्व परिस्थिती त्यांना कळली आहे, पण वळली नाही. त्यामुळे आतातरी त्यांनी सुधारायला हवे, नाहीतर महाराष्ट्रातील जनता त्यांना यापेक्षाही वाईट दिवस दाखवल्याशिवाय राहणार नाही. हाच हाल राहिला तर भाजप महाराष्ट्रातून हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही. 

बॅलेट पेपर पद्धतीद्वारे व्हाव्या निवडणुका
या निवडणुकीच्या निकालांनी आणखी एक गोष्ट अधोरेखित केली ती म्हणजे, बॅलेट पेपर मतदान. महाविकास आघाडी सरकारने यापुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या सर्व निवडणुका या ईव्हीएम द्वारे न घेता बॅलेट पेपर मतदान पद्धतीचा अवलंब करून घ्याव्या. कारण की, लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया अतिशय महत्वाची आहे. लोकांचा विश्‍वास या प्रक्रियेवर रहावा, यासाठी हे करणे आवश्‍यक आहे. भारतीय जनता पक्ष जेव्हा विरोधात होता, तेव्हा त्यांनीही बॅलेट पेपर मतदान पद्धती लागू करावी, यासाठी आग्रही भूमिका घेतली होती, असे लोंढे म्हणाले.

लोकशाहीवर विश्‍वास महत्वाचा
लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रियेवर लोकांचा विश्‍वास असणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया राबवल्यास जास्तीत जास्त काय होईल, एक दिवसाच्या ऐवजी निकाल लागण्यास चार-पास दिवस लागतील. ४५ दिवसांची प्रक्रिया राबवायला ५० दिवस लागतील. अमेरिकेसारखे बलाढ्य राष्ट्र जर बॅलेट पेपर मतदान पद्धतीचा अवलंब करीत आहे. तर आपण पुन्हा त्याच पद्धतीवर परत जायला हरकत काय आहे, असा प्रश्‍न करून महाविकास आघाडी सरकारला विनंती आहे की त्यांनी यापुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घाव्या, असे अतुल लोंढे म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com