महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, लोकलच्या फेऱ्या कमी करणार…

विदर्भात लॉकडाऊन परवडणार नाही. अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे विदर्भातील सर्व पालकमंत्र्यांशी चर्चा करून लॉकडाऊन ऐवजी काय पर्यायी निर्णय घेता येईल, याचा विचार करण्यात येत आहे. सध्या तरी आम्ही सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे.
Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar

नागपूर : कोरोनाचा नवा स्ट्रेन घातक आहे. याचा प्रसार फार वेगाने होतो. त्यामुळे आता अधिक सावध राहण्याची गरज आहे. विदर्भासह राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याचे दिसतेय. पण विदर्भाला लॉकडाऊन परवडणारे नाही. त्यामुळे विदर्भात पर्याय शोधला जाईल आणि मुंबईत लोकलच्या फेऱ्या कमी करण्याबाबत विचार सुरू असल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आज येथे म्हणाले. 

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब आहे. शासन पातळीवर उपाययोजना सुरू असल्या तरी त्याचा रिझल्ट काय येईल, हे आज सांगता येत नाही. तरी महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे, असे आपल्याला म्हणता येईल, असे सूचक वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले. विदर्भातील जिल्ह्यांतही कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे सरकार गंभीर असल्यानेच अधिवेशन कामकाजाचा कालावधी आठ दिवसांचा ठेवण्यात आला आहे, असे सांगतानाच मुंबईतही कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्याने मुंबईतील लोकल फेऱ्या कमी करण्याचा विचार सुरू असल्याचे ते म्हणाले. मुंबईत लोकलमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. गर्दीमुळे वेगाने कोरोना प्रसाराचा धोका लक्षात घेता फेऱ्या कमी करण्याचा पर्याय तपासून पाहू, असे वडेट्टीवार म्हणाले.

विदर्भात लॉकडाऊनचा पर्याय तपासणार
विदर्भात लॉकडाऊन परवडणार नाही. अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे विदर्भातील सर्व पालकमंत्र्यांशी चर्चा करून लॉकडाऊन ऐवजी काय पर्यायी निर्णय घेता येईल, याचा विचार करण्यात येत आहे. सध्या तरी आम्ही सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. कुणीही कार्यक्रम केल्यास त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. मंगल कार्यालयांवर वॉच ठेवण्यात आला आहे. सिनेमागृहांवर पूर्णत: बंदी घालण्याचाही आमचा विचार आहे. याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

लॉकडाऊनची वेळ येणार नाही, असे वर्तन आता नागरिकांनी ठेवावे. गेल्या वर्षीप्रमाणे सक्ती करण्याची गरज पडू नये. अत्यावश्‍यक कामाशिवाय लोकांनी बाहेर पडू नये. सक्तीपेक्षा स्वयंस्फूर्तीने नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळल्यास यावेळीही आपण कोरोनाला परास्त करू शकू, अशा विश्‍वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. प्रशासन आपल्या स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. विविध उपाययोजना केल्या जात आहे. रुग्णालये सज्ज केली जात आहे. पण कुणाला रुग्णालयात जाण्याची वेळच येऊ नये, अशी पद्धतीने लोकांनी प्रशासनाला प्रतिसाद दिल्यास कोरोनाचा प्रसार थांबविणे शक्य आहे, असेही ते म्हणाले.
 Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com