नागपूर : कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढू लागल्यानंतर २१ फेब्रुवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २६ मिनिटे भाषण केले. त्याला जनतेने प्रतिसाद दिला. आम्हीसुद्धा २४ फेब्रुवारीचे नियोजित जेलभरो आंदोलन पुढे ढकलले. पण राज्य सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेले आवाहन धुडकावत काल पोहरादेवी येथे शक्तिप्रदर्शन केले. मुख्यमंत्र्यांचेही ऐकत नाही, अशा मंत्र्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, असे राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे आज म्हणाले.
जनतेने कसे वागले पाहिजे, नियमांचे पालन कसे केले पाहिजे, याबद्दल विस्तृत संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला. कोरोनाचे नियम पाळण्याचे भावनिक आवाहन त्यांनी केले. यामध्ये जनतेने कसे वागले पाहिजे. राजकीय पक्षांनी काय केले पाहिजे. विरोधी पक्षाकडून त्यांना काय अपेक्षा आहेत, हे सांगितले. आम्ही विरोधी पक्ष म्हणून त्यांना प्रतिसाद दिला आणि आमचे नियोजित जेलभरो आंदोलन पुढे ढकलले. मात्र त्यांचा हा संदेश वनमंत्री संजय राठोड यांना पटला नसावा. म्हणून त्यांनी काल वाशीम जिल्ह्याच्या पोहरादेवी येथे दर्शनाच्या नावावर शक्तिप्रदर्शन केले. तेथे हजारो लोकांनी गर्दी केली होती. गर्दीतील १० हजार लोकांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सांगितले. पण गर्दीतील लोकांवर गुन्हे दाखल करण्यापेक्षा ज्या मंत्र्यांमुळे तेथे गर्दी झाली त्यांच्यावर आधी गुन्हे दाखल केले पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा संजय राठोड यांनी अपमान केला. तरीही कालपासून मुख्यमंत्री त्यावर काहीही बोलत नाहीये. याचा काय अर्थ घ्यावा? मुख्यमंत्र्यांनी राठोडांना गर्दी जमवण्यासाठी परवानगी दिली होती का, याचे उत्तर त्यांनी द्यावे. परवानगी दिली असेल तर महाराष्ट्राच्या जनतेला तसे सांगावे, नाहीतर मंत्री राठोडांवर कारवाई केली पाहिजे. पण यावर ते काही बोलत नाहीत. पोलिसांनी काल सांगितले की, गर्दी करणाऱ्या १० हजार लोकांवर आम्ही गुन्हे दाखल करू. पण त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नये. कारण मंत्री तेथे गेले नसते तर लोकही गेले नसते. त्यामुळे कारवाई मंत्री राठोड यांच्यावर झाली पाहिजे. राज्य सरकारने आता लपाछपीचा खेळ बंद केला पाहिजे, असेही बावनकुळे म्हणाले.
हे सुद्धा वाचा: शक्तीप्रदर्शन संजय राठोडांचे गुन्हा मात्र, दहा हजार लोकांवर
ही राठोडांना वाचवण्याची प्रक्रिया
काल पोहरादेवी येथे दाखवण्यात आलेले शक्तिप्रदर्शन म्हणजे राठोडांना वाचवण्याची प्रक्रिया आहे. तसं पाहिलं तर नैतिक जबाबदारी स्वीकारून संजय राठोड यांनी स्वतःहून राजीनामा द्यायला पाहिजे होता आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी तो राज्यपालांकडे पाठवायला पाहिजे होता. पण यांच्याकडे नैतिकताच शिल्लक राहिली नाहीये. नैतिकतेच्या बाता करणारे सर्व विसरले आहेत. त्यामुळे राज्यात अशी प्रकरणं होत असल्याचा घणाघाती आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.