भाऊ, सरकार दीड हजार देणार आहे म्हणे; पण कधी मिळतील, माहीत नाही...

गेल्या दोन महिन्यांपासून हाताला काम नसल्यामुळे त्यांच्यासमोर जीवनमरणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. नागपूर विभागात तीन लाख २० हजार कामगारांची नोंद झाली आहे. बांधकाम क्षेत्रातील कामे बंद आहेत. त्यावर विसंबून असलेली कामेही बंद झाली आहेत.
Sarkarnama Banner
Sarkarnama Banner

नागपूर : कोरोनाच्या महामारीत सर्व उद्धवस्त होत चालले आहे. सर्वाधिक फटका बसला आहे, तो म्हणजे असंघटित कामगारांना. त्यातल्या त्यात बव्हंशी जिल्ह्यांत रोजगार हमी योजनेची कामे सुरू नसल्याने मजुरांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. असंघटित कामगारांच्या व्यथा तर वेगळीच कहाणी सांगतात. इमारत बांधकाम कामगार अजय पाटील म्हणाले, ‘भाऊ सरकार दीड हजार देणार आहे म्हणे. ते कधी मिळतील, याचा नेम नाही.’, त्यामुळे जगावे कसे, हा प्रश्‍न पडला आहे. हा एक नव्हे तर हजारो, लाखो अजय पाटलांचा प्रश्‍न आहे. 

काही कामगारांशी बोलणी केली असता ते म्हणाले, नोंदणीचा फार्म कोठे भरतात, हेही माहीत नाही. गेल्या २० वर्षापासून इमारतीच्या बांधकामावर आहे. साधी कोणती योजना मिळत नाही. कोरोनाने तर आमच्या चुलीच विझविल्या आहेत. प्रश्न गंभीर आहे, कसे जगायचे कळत नाही. आता तर जगायचीही इच्छा होत नाही. तुम्हीच सांगा काय करायचे, कसे जगायचे. हा प्रश्न एका अजय पाटीलचा नाही तर हजारो असंघटित कामगारांचा आहे. गेल्या दोन महिन्यांत ठिय्यावर काम नसल्याने हजारो कामगारांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात १४ लाख नोंदणीकृत कामगार आहेत, हे विशेष. 

अजय पाटील हे हुडकेश्वर भागात राहतात. इमारत बांधकाम करतात. गेल्या दोन महिन्यापासून काम बंद झाले. काही दिवसांपूर्वी काही काम मिळायचे. मात्र आता पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे घरी राहून दिवस काढावे लागत आहे. कोरोनाची स्थिती किती दिवस राहील, हे सांगता येत नाही. मात्र आमच्या समोर जगण्यामरण्याचा प्रश्‍न उभा ठाकला आहे, असे अजय पाटील सांगतात. असे एक नाही हजारो अजय पाटील यांची जगण्यासाठी मरमर सुरू आहे. राज्यामध्ये १४ लाख मजुरांची नोंदणी झाली आहे. तर दोन लाखांपेक्षा अधिक बेरोजगारांनी नोंदणी अर्ज केला आहे. मात्र, दोन महिन्यापासून कोरोनामुळे संपूर्ण राज्यात लॉकडाउन आहे. त्याचा थेट परिणाम असंघटित क्षेत्रातील कामगारांवर झाला आहे. 

गेल्या दोन महिन्यांपासून हाताला काम नसल्यामुळे त्यांच्यासमोर जीवनमरणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. नागपूर विभागात तीन लाख २० हजार कामगारांची नोंद झाली आहे. बांधकाम क्षेत्रातील कामे बंद आहेत. त्यावर विसंबून असलेली कामेही बंद झाली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात असंघटित क्षेत्रामध्ये बेरोजगाराची संख्या वाढली आहे. यातील हजारो मजूर भाड्‌याच्या घरात राहत असून येणाऱ्या काळात त्यांना घरभाडे देणेही मुश्‍कील होणार आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहून घरमालक त्यांना घराबाहेर काढत असल्याचे धक्‍कादायक प्रकार काही भागात उजेडात आले आहेत. 

राज्य शासनाने जाहीर केलेली दीड हजारांची मदत ३ लाख ३० हजार नोंदणीकृत कामगारांनी वाटप करण्यात आली आहे. ही रक्कम ४८ कोटी रुपयांची आहे. ज्या कामगारांना ही रक्कम मिळाली नाही. त्यांना तातडीने देण्याचा प्रयत्न करणार आहोत. कामगारांचे हित जपण्यासाठी कटिबद्ध आहोत. 
- राजदीप धुर्वे, सहायक कामगार आयुक्त, नागपूर.

सरकारने असंघटित क्षेत्रातील लोकांची मदत करणे गरजेचे आहे. कोरानाच्या काळात राज्य सरकारने दिलेली रक्कम अतिशय तुटपुंजी आहे. यात वाढ करावी, अशी आमची मागणी आहे. 
हरीभाऊ गाडबैल, कामगार व शेतकरी नेते, नागपूर.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com