कोरोना स्थितीत मुंढेंच्या पाणीदर वाढीस भाजपचा कडाडून विरोध

महानगरपालिका म्हणून आपले जनतेप्रती पालकत्व आहे. हे पालकत्व स्वीकारून मुदतवाढी संबंधीचा निर्णय आयुक्तांनी सभागृहापुढे धोरणात्मक निर्णयासाठी पाठवावा. मनपाच्या हिताचे अनेक निर्णय राज्यशासनाकडून मनपा आयुक्तांनी यापूर्वीही मंजूर करून आणले आहेत.
Sandip Joshi - Tukaram Mundhe
Sandip Joshi - Tukaram Mundhe

नागपूर : महानगरपालिका कायद्यानुसार दरवर्षी पाच टक्के पाणी करवाढ प्रस्तावितच आहे आणि ही करवाढ करणार, असे आयुक्तांनी याआधीच जाहिर केले. पण कोरोनामुळे उद्भवलेल्या स्थितीत ही करवाढ करु नये, अशी सूचना महापौर संदीप जोशी यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांना केली. आयुक्तांची कार्यपद्धती पाहता हा निर्णय ते मागे घेणार नाहीत आणि महापौर आपली मागणी रेटून धरतील, असे आजवर घडलेल्या घडामोडींवरुन एकंदरीतच दिसतंय. त्यामुळे पाणी करवाढीवरुन महापालिकेत पुन्हा वाजणार का, असा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने सर्वांचेच कंबरडे मोडले आहे. त्यातच पाणी करामध्ये पाच टक्के करवाढीचा निर्णय आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतला. ही प्रस्तावित करवाढ त्यांनी एक वर्ष पुढे ढकलावी, अशी सूचना महापौर संदीप जोशी यांनी केली आहे. महानगरपालिका कायद्यानुसार ५ टक्के पाणीपट्टी करवाढ करण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत. पण कोविडमुळे उद्भवलेली स्थिती पाहता आयुक्तांनी मुदतवाढीचे धोरण राज्य शासनाकडून मंजूर करुन आणावे, असेही महापौरांनी सुचविले.

आज कोव्हिडच्या संकटाच्या या काळात सर्वसामान्य नागरिकांसह व्यावसायिक, नोकरदार साऱ्यांचेच हाल झाले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, बाजार ठप्प झाल्याने व्यावासायिकांचेही कंबरडे मोडले आहे. अशा स्थितीत पाणी करामध्ये पाच टक्के दरवाढीचा घेतलेला निर्णय हा जनतेच्या जखमांवर मीठ चोळणारा ठरेल. महानगरपालिका ही शहरातील नागरिकांचे पालकत्व स्वीकारलेली संस्था आहे. त्यामुळे कोव्हिडच्या या स्थितीत ही करवाढ करून जनतेला आणखी संकटात ढकलू नये. यासंबंधी दरवाढीला एक वर्षाची मुदतवाढ देण्यासाठी राज्यशासनाकडे धोरण मंजूरीसाठी पाठविण्यात यावे, असे महापौरांनी सुचविले आहे.

महानगरपालिका म्हणून आपले जनतेप्रती पालकत्व आहे. हे पालकत्व स्वीकारून मुदतवाढी संबंधीचा निर्णय आयुक्तांनी सभागृहापुढे धोरणात्मक निर्णयासाठी पाठवावा. मनपाच्या हिताचे अनेक निर्णय राज्यशासनाकडून मनपा आयुक्तांनी यापूर्वीही मंजूर करून आणले आहेत. या संकटाच्या काळात जनतेच्या हिताचा हा मुदतवाढीचा निर्णयही राज्यशासनाकडे मंजुरीसाठी पाठवून तो मंजूर करून आणावा. आज शहरातील अनेक प्रकल्प, रस्त्यांची अर्धवट कामे थांबलेली आहेत. कंत्राटदारांची देयेकही थांबलेलीच आहेत. अशा स्थितीत पाणीपट्टीतील पाच टक्के करवाढ थांबविल्याने कोणतेही मोठे संकट उद्भवणार नाही. असेही महापौरांचे म्हणणे आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com